भारतीय स्त्री शेकडो वर्षे शिक्षण आणि सामाजिक हक्कापासून वंचित होती.अनेक शतके रुढी परंपरेच्या जंजाळात जखडलेली होती.त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पहायला मिळत असे. या साऱ्या प्रश्नाची मूळ कारणे तेव्हा क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांना अस्वस्थ करीत होती स्त्रियांच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून त्यांच्या परिर्वतनासाठी शिक्षणाच्या नंदादीपातून समाजमन प्रज्वलित करण्यासाठी त्यानी सावित्रीमाईला सुशिक्षित केलं आणि एका देदीप्यमान उज्ज्वलशाली पर्वाची पहाट उदयास आली. अतिशय खडतर कटूमय मार्गातून कणखर व संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे ह्या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नापुढे समाजकंटकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शिक्षणाची दालने स्त्रियांकरिता खुली करून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास साऱ्या विश्वाला प्रेरणादायी आहे.
आज भारतीय स्त्रियांची गरूडभरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याची फलश्रूती आहे. अनेक पिढ्यांचे परंपरेचे जू झुगारून आपल्या पतीच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराला साथ देऊन स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे सावित्रीबाईंचे धाडसच म्हणावे लागेल . कारण आजही रूढी, परंपरा, जात, धर्म, व्रत वैकल्य टिकवण्यासाठी स्त्रिया पुढाकार घेताना दिसून येतात. पण अठराव्या शतकात सावित्रीबाईचे हे पाऊल म्हणजे एक आश्चर्यच आहे .पुरोगामी महाराष्ट्रातील स्त्रियांचा शिक्षण व जीवनमान दर्जा केरळसह आणखी काहीच राज्य आपल्या पुढे आहेत, तसा देशातील इतर राज्यांच्या मानाने उच्चस्तरीय आहे. याचे श्रेय सावित्रीजोती या दापंत्यास द्यावे लागेल. पुढे स्त्रियांच्या उन्नतीसाठी हिंदुकोड बिल मांडणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातील मार्गदर्शकतत्वामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणतील अशा सर्व प्रथांचा त्याग केला जाईल, असे नमूद केले आणि त्या त्यानुसार सर्व स्थरांतील महिलांचे शोषण, छळ रोखणे व त्यांच्या उन्नतीकरीता 1993 साली देशातील पहिले महिला धोरण तेव्हाचे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तयार केले. त्याच वर्षी स्वतंत्र महिला व बाल विकास विभागाची स्थापना केली विविध कल्याणकारी योजना व प्रतिबंधात्मक कायदे करुन सावित्रीबाईंच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर स्त्री जीवनाला फलद्रूप केले आहे. आज महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या आनाथ निराधार निराश्रीत वंचित तसेच संकटात सापडलेल्या महिला यांच्यासाठी सुरू केलेली सुतिकागगृह ही आजची केंद्र व राज्यशासनामार्फत चालवली जाणारी सखी केंद्रे, माहेर योजना, दत्तक विधान योजना बालगगृहे ही सावित्रीबाईंच्या महिलाप्रती असलेल्या उच्च सन्मान, प्रतिष्ठा, आत्मनिर्भरतेची साक्ष देतात..
सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाची कठीण काळात केलेली सुरवात ही एक ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी आहेच पण त्यांनी लिहीलेलं बावन्नकशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले यातून त्यांच्या मानवजाती प्रती असलेल्या सदविचारांची जाणीव होते
वाचे उच्चारी ।तैसा क्रिया करी
तीच नरनारी ।। पूजनिय
सेवा परमार्थ । पाळी व्रत सार्थ
होई कृतार्थ। । तेच वंद्य
सुख दुःख काही। स्वार्थपणा नाही
परहित पाही। तोच थोर
मानवाचे नाते । ओळखती जे ते
सावित्री वदते। तेच संत
सावित्रीबाईंच्या वरील विचारातून त्यांच्या जाती-धर्मा पलीकडच्या विश्वकुटुंबाच्या संकल्पनेची प्रचीती येते. जोतीरावांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी यशवंत हा पोटचा मुलगा नाही म्हणून विरोध झाल्यावर स्वतः हातात टिटवं घेऊन पतीच्या चितेला भडाग्नी देणारी वाघाच्या काळजाची स्त्री भारतीय महिलांचा आदर्श आहे .जोतीरावांच्या नंतर सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून पतीचे अर्धवट कार्य लिखाण, सेवा कृतीच्या रूपाने पुढे घेऊन जाणारी शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या कल्याणाकरिता देह झिजवणारी सावित्रीमाता आमची राष्ट्र माता आहे असे म्हणणे वावगे होणार नाही .3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम नक्की अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यावतीने या क्रांती जोतीस विनम्र अभिवादन.
सुवर्णा पवार
जिल्हा महिला व बाल विकास
आधिकारी, सांगली.