पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सतत लढा देत होतेच…त्याच वेळेस वैधानिक पातळीवर देखील अनेक लोकप्रतिनिधी पत्रकारांना मदत करीत होते.. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सातत्यानं पत्रकार संरक्षण कायद्याचा विषय लावून धरला होता.. वेगवेगळी वैधानिक आयुधे वापरून त्यांनी प्रत्येक अधिवेशनात कायद्याचा विषय लावून धरला… शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरे यांनीही वेळोवेळी वरिष्ठ सभागृहात या विषयाला वाचा फोडली होती.. कॉग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी प्रत्येक अधिवेशनात हा विषय विधानसभेत मांडला… सरकारला या विषयावर निवेदन करायला भाग पाडले.. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासगी विधेयक मांडून या विषयाची तीव्रता सरकारच्या नजरेस आणून दिली..
या शिवाय राज्यातील १७३ आमदार, ९ खासदार, ४ मंत्री यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या ठिकठिकाणच्या प़तिनिधीं कडे कायद्याला पाठिंबा व्यक्त करणारी लेखी पत्रे समितीकडे दिली होती.. ही सर्व पत्रे नंतर आम्ही तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली.. या सर्वाचा सरकारवर नक्कीच दबाव आला आणि कायद्याचा मार्ग सुकर झाला.. देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर विधान सभेत आणि नंतर विधान परिषदेत कायद्याचे विधेयक मांडले.. त्याला कोणी विरोध केला नाही.. एकमतानं हा कायदा संमत झाला.. त्यामुळे वरील सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.. कायदा व्हावा यासाठी असंख्य ज्ञात – अज्ञात हात आमच्या पाठिशी होते.. या सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नसलं तरी आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देत आहोत.. आमचे काही पत्रकार मित्र जाहीरपणे पत्रकार संरक्षण कायदा होता कामा नये म्हणून आग्रही होते.. शासकीय पातळीवर त्यादृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू होते.. त्यांचा हा विरोध आम्हाला प्रेरणा देणारा होता..विरोधी मित्रांमुळे आम्ही ही लढाई अधिक नेटानं लढलो.. परिणामतः कायदा झाला.. त्यामुळं विरोध करणारांनाही धन्यवाद द्यावे लागतील.. काही जण म्हणायचे कायदा होणारच नाही… एसेम दगडावर डोकं आपटून घेत आहेत त्यांच्या या भावनाही माझ्यासाठी प्रेरणास्रोत ठरल्या… त्यांचेही आभार..
अनेकदा मलाही नैराश्य यायचं, कायदा होईल की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकायची.. परंतू आंदोलनास मिळणारा प्रतिसाद पाहून माझं नैराश्य दूर व्हायचं आणि मी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागायचो.. मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो की, 12 वर्षांच्या या प़दीर्घ लढयात राज्यातील एकाही पत्रकारानं माझ्या हेतूबद्दल शंका घेतली नाही, कायदा होत नाही, नेतृत्व बदला असा सूरही कोणी आळवला नाही.. राज्यातील पत्रकारांच्या या विश्वासाला तडा जाईल असे वर्णन आम्ही कधी केले नाही.. याचा आनंद आज होत आहे.. मी आणि किरण नाईक निमित्तमात्र होतो.. राज्यातील पत्रकार ही लढाई लढत होते.. त्यामुळे हे यश केवळ आणि केवळ पत्रकारांच्या एकजुटीचे आहे याची नम्र जाणीव मला आहे..
कायदा व्हावा यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सर्वांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आभार व्यक्त करतो..
-एस.एम.देशमुख
निमंत्रक
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई