जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या खेड्यात जन्मलेल्या अल्प शिक्षण,पण पडेल ते कामाची
मानसिकता आणि आकाशाला गवसणी घालण्याच्या जिद्द असलेल्या म्रुदुस्वभावाच्या माणसाने
उभारलेल्या साम्राज्याला ५० व्या वर्धापनदिनी सलामी देण्याचा प्रयत्न. २६ जानेवारी १९६८
मध्ये कै.दामोदर दिनकर उर्फ मधुकाका कुलकर्णी यांनी श्रीविद्या प्रकाशन संस्थेची स्थापना
केली. श्रीविद्या प्रकाशन या शब्दाबरोबर डोळ्यापुढे येतात ते गोल चेह-याचे हसमुख मधुकाका
कुलकर्णी किंवा मधुकाका म्हटल तर डोळ्यापुढे येतो तो मराठी साहित्यातील एक से एक
बढकर अनेक नामवंत लेखकांचा अजरामर साहित्याचा डोंगर. पु.ल.देशपांडे,डॉ य.दि.फडके,
डॉ. जयंतराव नारळीकर, एन.व्ही.फडके, माधवराव गडकरी, वी.स.वाळिंबे, आदरणीय
रा.चिं.ढेरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मालती पांडे, प्र.ना.बेहरे,अरुण टिकेकर,
इसाकमुजावर, डॉ पदमाकर दुभाषी,माधवराव गोडबोले, डॉ हे.वि. सरदेसाई ,भालचंद्र फडके,
रामदास फुटाणे अशा अनेक नांवांची जंत्री लिहित बसलो तर एक ग्रंथच तयार होईल.
श्रीविद्याच्या ह्या हरहुन्नरी माणसाने मराठी साहित्यात एक आदरयुक्त दरारा निर्माण केला
होता असच मी म्हणेन. श्रीविड्या प्रकाशनाच बँक अकौंट पुण्याच्या जनता सहकारी बँक मध्ये
होते, त्यामुळे त्यांचेशी बोलण्याचा, श्रीविद्याला भेट देण्याचे भाग्य मला लाभले. माधुकाकांनी
किती विविध स्वभावाची माणसे स्नेहाने गुंफली होती. परदेशात जाऊन पुस्तकाचे प्रकाशन
करण्याचे श्रेय श्रीविद्याला जाते. कुंपणापलीकडले शेत, गोठलेल्या वाटा, हिमगंध हि पुस्तके
अमेरिकेत तर ध्वजदंड हि कादंबरी मास्कोत,तमसातटाकीचे लंडन येथे झालेले प्रकाशन हे
प्रकाशन विश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा म्हणजे एखाद्या
चित्रपटाचा प्रीमिअयर शो चाच समारंभ वाटावा असा देखणा. प्रीमियर शोला सेलिब्रिटी
कलाकारांना पहायला त्यांचे चाहते गर्दी करतात तसेच चित्र श्रीविद्याच्या प्रकाशन समारंभास
मराठी साहित्यातील नामवंत लेखकांना पहाण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी होत
असे. श्रीविद्याच्या प्रकाशन समारंभाला पुस्तकाच्या विषयास अनुसरून प्रमुख पाहुणे,वक्ते
मधुकाका आवर्जून बोलवत हे त्याकाळातील एक वैशिष्ठ्यच होते. रा.चि.ढेरे यांच्या “ लज्जा
गौरी “ या ग्रंथाचे प्रकाशनासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हस्ते करत असताना त्यांचे
बरोबर य.दि फडके, माधवराव गडकरी यांच्या भाषणाबरोबरच आण्णा ढेरे यांचे अभ्यासपूर्ण
विचार ऐकताना श्रोते तल्लीन झालेले पहिले आहे. ज्येष्ठ कलाकार शांताबाई हुबळीकर यांच्या “
कशाला उद्याची बात “ या पुस्तकाचे प्रकाशनाचे वेळी उषा किरण व शाहू मोडक यांना
पहाण्यास जमलेली गर्दी आठवते. य.दि.फडके लिखित “ केशवराव जेधे ‘ चरित्र ग्रंथाचे
प्रकाशनाचे वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व नानासाहेब गोरे यांचे भाषणातील चुटकुले
ऐकण्याची मजा काही औरच होती. उषाकिरण लिखित “उष:काल “ या आत्मचरित्र प्रकाशनाचे
वेळी शबाना आझमीनी केलेलं कौतुक. मधुकाकांनी स्मिता पाटील, अशोककुमार,लीला
चिटणीस, श्रीमंत पद्मीनीताईराजे पटवर्धन असे सेलिब्रिटीज , आणि शरद पवार,सुशीलकुमार
शिंदे,बाबा आढाव, निलमताई गोऱ्हे, विद्याबाळ, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा
पाटकर, प्रा.शिवाजीराव भोसले,जयंत नारळीकर अशा दिग्गजांना श्रीविद्याच्या मांडवात जमा
करण्याची मधुकाकांची हातोटी होती.इतका स्नेह त्यांनी निर्माण केला होता.समाजवादी
विचारातून त्यांनी लहानपणापासून क्रांतिकारी चळवळीत भाग घेतल्याने माधुकाकांनी जेलची
हवाही खाल्ली होती. त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंदले गेलेले आहे हे फारच कमी
लोकांना माहित असेल.श्रीविद्याला आखिल भारतीय स्तरावर उत्तम साहित्य निर्मितीचे
पारीतोषीक सलग दोन वेळा मिळाले. १९८१ साली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री ना. वसंतराव साठे
यांच्या हस्ते तर १९८२ साली राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राचे भाई पूज्यनीय पु.ल.देशपांडे व सुनीताताई यांनी आपल्या पुस्तकांचे हक्क श्रीविद्या
प्रकाशन संस्थेला देवून पुस्तकाचे “ प्रकाशकांचे हक्क “ हा लेखक व प्रकाशन संस्था यांचेतील
नवा पायंडा प्रकाशन विश्वात पहिल्यांदा निर्माण केला हा श्रीविद्यावरील केवढा विश्वास.
आदरणीय भाईंच्याप्रमाणेच डॉ.य.दि.फडके, डॉ.हे.वी.सरदेसाई. डॉ.जयंतराव नारळीकर,
माधवराव गडकरी आशा ज्येष्ठतम साहित्यकांनी आपला अनमोल ठेवा श्रीविद्या अर्थातच
मधुकाकांच्या हवाली,तोही विश्वासाने सुपूर्द केला ही मधुकाकांची क्षमता होती. मधुकाकाचे
नंतर त्यांचे पुत्र उपेंद्रने त्याच तडफेने सुरवात केली पण श्रीविद्याला त्यांचा सहवास कमी
मिळाला.आता माधुकाकांची नातसून व उपेन्द्र्ची सून सौ.श्रीती ही परत तीच झळाळी
आज्जेसास-याच्याच जिद्दीने श्रीविद्याला आणण्याचा प्रयत्न करतेय हेही कौतुकाचेच.
श्रीविद्याच्या ५० व्या वर्धापनाच्या निमित्ताने सर्व रसिक वाचकांतर्फे मनापासून शुभेच्छा.
दरवर्षी अनेक अनेक उत्तम साहित्याचा नजराणा मराठी रसिकांना सादर होऊ देत हीच अपेक्षा
ठेवतो.
सुहास जोशी (९८९००१५२३४).