नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहानभूक हरली…
कृष्णजन्माष्टमी जवळ आली की मन नकळत कृष्णमय होऊन जाते आणि कृष्णाचे गोडवे गाणारी गाणी मनात फेर धरून नाचायला लागतात. त्यातीलच हे एक गाणे. कृष्ण म्हटलं की डोळ्यांसमोर राधाकृष्ण उभे राहतात आणि बासरीही.
खरंच आहे की बासरीच्या सुरांनी राधेला वेड लावलं होतं पण सर्व सख्या, गोपिका, मुके जीव अगदी सगळयांनाच मोहिनी घातली होती. श्रीकृष्ण हा सोळा कलांनी परिपूर्ण आहे असं पुराणात म्हटलंय आणि श्रीकृष्णाला सर्वांत प्रिय म्हणजे बासरी.
एकदा चिडून जाऊन सगळ्या गोपी-सख्यांनी बासरीला विचारलं की, आम्ही श्रीकृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला असतो; पण आम्हाला साधा भावही देत नाही, तुला मात्र सतत ओठांशी धरून असतो. अशी जादू तरी काय केली आहेस तू…?
बासरीने सांगितले, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग तुम्हालाही श्रीकृष्ण जवळ घेईल.’
ती म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे, ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळही आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडला आहे.
माझ्यावर असणार्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व शत्रू मी काढून टाकले आहेत.’ खरंय की नाही…या उत्तरातून खूप छान संदेश बासरीने दिला आहे.
तर अशी ही बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू तोडतात तेही तिथी पाहून. पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना बांबू तोडला तर कीड लागते. कारण या तिथींच्या शेवटी ‘मी’ येतो, या मीपणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो व बासरी टिकत नाही, असा लोकसमज आहे.
लोकगीत आणि वाद्यवृंदात रमलेल्या या बासरीला शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार मैफलीत स्थान मिळवून दिलं ते कै. पं. पन्नालाल घोष यांनी.
तीन-चार तासांची केवळ बासरीची स्वतंत्र मैफल होऊ शकते हे पन्नालाल घोष यांनी दाखवून दिले.
तसंच या बासरीला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली ती पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी.
बोरिवलीला राहणारे प्रसिद्ध बासरीवादक आनंद काशीकर यांनाही बासरीवादनाची आवड लहानपणापासूनच. शाळेत असल्यापासून त्यांची बासरीशी गट्टी जमली पण खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू झाले ते बारावी नंतर. पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतले. गेली ३३ वर्षे आनंद काशीकर हे बासरीवादन शिकवताहेत आणि असंख्य विद्यार्थी घडवत आहेत. त्यांचा मुलगा अद्वैतबद्दल सांगायचं झालं तर ‘बापसे बेटा सवाई’ असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या चौथ्या वर्षापासून अद्वैतने आपल्या वडिलांकडे बासरीचे धडे गिरवायला सुरुवात केली. सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला स्कॉलरशिपही मिळालीय. इतकेच नाही तर ‘ऑल इंडिया रेडिओ’वरील २०१७ स्पर्धेचा तो विजेता आहे. लहान वयात अद्वैतने बासरीवादनात खूप मोठे यश संपादन करून हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. बासरीबद्दल काशीकरांकडून मिळालेली माहिती अशी – एकूण १२ स्केलच्या १२ बासऱ्या असतात. प्रोफेशनल कार्यक्रमासाठी जाताना १२ लहान आणि १२ मोठ्या अशा एकूण २४ बासऱ्यांचा सेट बरोबर घेऊन जावा लागतो. सोलोमध्ये वाजवायचे असेल तर साधारण ‘सफेद इ स्केल (सफेद ३ ज्याला वेस्टर्न स्केल इ म्हणतात)’ची बासरी लागते. पण सतार, संतूरसाठी ‘डी स्केल’ची बासरी वाजवतात. बासरी हे वाद्य तसे वाजवायला कठीण…कारण फुंकरेवरचा कंट्रोल असणं खूप महत्वाचं. हे टेक्निक शिकण्यासाठी कित्येक वर्षं सुद्धा लागतात. मात्र या वाद्याने फुफ्फुसाचा चांगला व्यायाम होतो. दम्याचा त्रास असणाऱ्यांना डॉक्टर सुचवतात की बासरीचे टेक्निक शिका, त्याने नक्कीच फरक पडतो. बासरीसाठी लागणारा बिनगाठीचा बांबू हा आसाममधील एका विशिष्ट ठिकाणाहून येतो. बांबूमध्ये गाठी असतातच, पण आसाममधल्या बांबूचं वैशिष्ट्य असं की २ गाठींमधील अंतर हे कधी कधी 3 ते 4 फूट एवढे असते. त्यामुळे मोठ्या बासऱ्या (ज्यांचा ध्वनी गंभीर किंवा सखोल असतो) बनवणे सोपे जाते. तसेच ह्या बांबूंची भिंत फार जाड नसते. त्यामुळेच तेथील बांबू बासऱ्या बनवण्यासाठी उत्तम ठरतात. या बांबूचे वैशिष्ट्य असे की त्यात गाठ जवळपास नसतेच. सध्या युपीमधील पीलीभीत या ठिकाणी बासरीचे सर्वाधिक विक्रेते आहेत.
मी जी बासरी वाजवतो त्याची लांबी पावणेतीन फूट आहे. एवढ्या मोठ्या बांबूत गाठ नाही. लॉकडाऊनच्या काळात काशीकरांचे ऑनलाईन क्लासेस चालू होते. याच लॉकडाऊनचा त्यांनी चांगला उपयोगही करून घेतला. त्यांनी जवळपास २४ बासऱ्यांचा सेट बनवला. स्वतः बनवलेली बासरी वाजवताना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.
असाच एक कृष्णभक्त जो बासरीची मनोमन सेवा करतो. बासरी वाजविणे हेच त्याचं आयुष्य आहे. याचं त्यांनी कुठेही शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नाही. मुरलीधर त्याचा गुरु. श्री कृष्णाचं नाव घेतो आणि बासरी वाजवतो. त्यांचं नाव आहे अरविंद कुमार. अयोध्येवरून मुंबईत कामधंद्यासाठी आलेल्या अरविंद कुमारांचं बासरीशी नातं जुळलं आणि मग तेच जीवन-उत्पन्नाचं साधन बनलं. गल्लोगल्ली ते बासरी वाजवत फिरतात आणि विकतातही. पाठीवरील पिशवीत २५० बासऱ्या घेऊन रोज फिरतात. १०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत बासऱ्या त्यांच्याकडे असतात. पितळ्याची बासरीसुद्धा त्यांच्या संग्रहात आहे. दिवसाच्या ३०-४० बासऱ्या तरी विकल्या जातात. प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया, विवेक सोनार अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांनी बासरी वाजवलेली आहे. पण तरीही गल्लोगल्ली फिरून बासरी वाजत फिरताना आत्मिक शांती मिळते, असं ते म्हणतात. हिरो सिनेमातील गाणी, चौदहवी का चांद है, होठोसे छु लो तुम, एक प्यार का नगमा हे… अशी अनेक लोकप्रिय गाणी बासरीवर वाजवत सकाळ ते संध्याकाळपर्यंत फिरत असतात. त्यांचा मुलगाही बासरी वाजवतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ते आत्मसात करणे कठीण नाही, हे अरविंद कुमार यांच्याकडून शिकावं.
बासरीबद्दल जाणून घेताना, ही बासरी ऐकताना सगळे मंत्रमुग्ध का होतात…याचं गुपित आता कुठे उलगडलं
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहानभूक हरली…
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068