पिंपरी-
भारतात सावरकर आणि त्यांच्या विषयावर सातत्याने काही न काही पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक एक यंत्रणा राबत आहे. त्याची कारणं शोधत असताना डोक्यात विचार आला की, असं आंबेडकर यांच्या विरोधात कोणी करेल का?, असं फुलेंच्या विरोधात करेल का? टार्गेट करायला सर्वाना सावरकरच का सापडतात? असा सवाल प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केला. ते स्वरगंधर्व संगीत महोत्सवात बोलत होते. दिल्लीतील एका मुलामुळे सावरकर हा शब्द पुन्हा चर्चेला आलेला आहे. ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्याला सावरकरांचा इतिहास माहीत असण्याची अपेक्षा करणं हे चुकीचं असल्याचंदेखील शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
शरद पोंक्षे म्हणाले की, आज हिंदुस्थानामध्ये सावरकर हा शब्द दिल्लीतील एका मूर्ख मुलामुळे फार चर्चेला आलेला आहे.
मी त्या मुलाचा आभारी आहे. त्याने दर एक,दीड महिन्यांनी अशी वक्तव्य करत राहावीत. जेणेकरून प्रत्येक हिंदू माणसाच्या आतील सावरकर जागे होतात. हिंदू राष्ट्रवाद असा उफाळून येतो, मग सर्वजण कामाला लागतात. त्यानी असा गाढवपणा करत रहावा, असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सावरकरांचा फोटो असलेलं पहिलं टपाल तिकीट छापलं होतं. दादरमध्ये शिवाजी पार्कच्या समोर सावरकर यांचं राष्ट्रीय स्मारक उभं आहे. तेव्हा, त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यातून १५ हजार रुपये ते स्मारक उभारण्यासाठी दिले होते. त्यामुळे सावरकर यांची किंमत इंदिरा गांधी यांना माहीत होती.
सावरकर हे ब्राह्मण होते, त्यांचा अपमान केला म्हणून चार ब्राह्मण रस्त्यावर उतरले आहेत किंवा त्यांनी निषेध नोंदवला आहे, असं आजपर्यंत पाहिलं नाही. ज्यांना एका ब्राह्मण नावाच्या चौकटीत बांधलं जातं. त्या माणसाने आयुष्यात कधीही जात मानली नाही. त्यांनी एकच जात मानली, ती म्हणजे हिंदू जात. त्यामुळे हा सर्व हिंदू समाज, सर्व जाती संपवून एकत्रित यावं आणि हिंदू जाती म्हणून उभं राहावं यासाठी आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या घोषणा ते देत राहिले. हे हिंदू राष्ट्र व्हावं असा त्यांचा आग्रह होता, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले.
सावरकर हे हिंदुत्ववादी, सावरकर यांचा हिंदुत्ववाद आपण आजपर्यंत जाणून घेतला नाही. त्यामुळे जो येतो तो सावरकरांबद्दल वक्तव्य करत सुटलेला असतो, असा टोलाही पोंक्षे यांनी लगावला.