मुंबई : कोरोनाचे संकट आणि तद्अनुषंगाने लागू झालेली टाळेबंदी यांचा थेट परिणाम भारतीय नागरिकांच्या मानसिकतेवर आणि वर्तणुकीवर झाला आहे. देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या, म्हणजे 52 टक्के नागरिक हे या काळात पर्यावरणाविषयी, वृक्षारोपणाविषयी जागरूक झाले आहेत, तसेच खरेदी करताना व उर्जेची बचत करताना ते अधिक सजग झाले आहेत. ‘गोदरेज समुहा’तर्फे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लिटल थिंग्ज वी डू’ या शीर्षकाच्या एका संशोधन अहवालात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असताना, तसेच अनेक राज्यांमध्ये टाळेबंदी लागू होत असताना, जबाबदार नागरिक व संस्था यांना देशासाठी आपले कर्तव्य बजावण्याची आठवण ‘गोदरेज’च्या या अहवालातून करून देण्यात आली आहे. आपले जीवन अधिक सुसह्य व्हावे याकरीता गेल्या वर्षी 10 महिन्यांच्या टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी पत्करलेली दिनचर्या, सवयी आणि हावभाव यांचे विश्लेषण ‘द लिटल थिंग्ज वी डू’ या संशोधनात करण्यात आले. या कालावधीत 44 टक्के नागरिकांनी वंचितांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक या नात्याने सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
यातील आकडेवारीनुसार, घरातच राहण्याची सक्ती आणि इतर निर्बंधांमुळे भारतीयांची सर्जनशीलताही मुक्त झाली. दर पाचांमधील एकजण (22.87 टक्के) आता यापुढे स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वयंपाक, रंगकाम, चित्रकला किंवा इतर सर्जनशील छंद जोपासेल, अशी शक्यता जास्त आहे. टाळेबंदीच्या काळात सुमारे एक चतुर्थांश (23.19 टक्के) नागरिकांनी संगीत ऐकणे, वाचन यांसारखा विरंगुळा मिळविला.
हे निष्कर्ष ‘एसईएमरश’च्या दुसर्या एका संशोधनाशी सुसंगत आहेत. फेब्रुवारी ते मार्च 2020 या काळात “केक कसा बनवावा” यासारख्या विषयांचा शोध इंटरनेटवर घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत 238.46 टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये, हे ठराविक शब्द शोधणाऱ्यांच्या संख्येत 81 टक्क्यांची आणि त्यापुढील महिन्यात 190 टक्क्यांची वाढ झाली होती.
संचारबंदीच्या आदेशाचे भारतीय कुटुंबांना इतरही फायदेही मिळाले. लांबचे प्रवास आता करावे लागत नसल्याने आपल्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवता येतो, असे 36 टक्के जणांनी सांगितले; तर काम करीत असताना ताण घालवण्यासाठी आणि कामाचे रोजच्या आयुष्याशी संतुलन राखण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेत असल्याचे 29 टक्के जणांनी नमूद केले आहे. काम करताना त्यात व्यत्यय येत नसल्याने ते दिलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य होते व त्यामुळे कार्यक्षमता वाढल्याचा अनुभव येतो, असे 19 टक्के लोकांनी सांगितले. घरातून काम केल्याने (वर्क फ्रॉम होम) आपले वेळेच्या व्यवस्थापनातील कौशल्य सुधारण्यास मदत झाली, असे 16 टक्के जणांनी म्हटले.
गोदरेज समुहाच्या कार्यकारी संचालिका व मुख्य ब्रॅंड अधिकारी तान्या दुबाश यांनी या संशोधनाचे वर्णन, “अनेक प्रसंगांमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपल्या नागरिकांची क्षमता, त्यांची चिकाटी व परोपकारी वृत्ती याचे यथार्थ वर्णन करणारे औत्सुक्यपूर्ण व अनोखे संशोधन”, या शब्दांत केले आहे. लोकांचे एकूण स्वास्थ्य जपण्यात ज्या गोष्टींमुळे मोठा फरक पडू शकतो, त्या लहान गोष्टी आणि लोकांचा दैनंदिन नित्यक्रम यांविषयी या संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे. “आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ज्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष करण्यात येते, अशा गोष्टींना या कोरोनाच्या साथीच्या काळात पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे,” असे दुबाश म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “सध्याच्या या कसोटीच्या काळातील एक सकारात्मक बाजूही या संशोधनात पुढे आली आहे – दीर्घकाळ काम करण्याच्या पद्धतींचा सध्या फेरविचार केला जात आहे. 36.16 टक्के जणांनी सांगितले, की त्यांनी आरोग्यदायी नसलेल्या सवयी आता सोडून दिल्या आहेत; तर 58.22 टक्के जणांनी आता मानसिक आणि शारिरीक फिटनेसला मदत करणाऱ्या अने6क गोष्टी, उदा. योगा, चालणे किंवा ध्यानधारणा सुरू केल्या आहेत.”
“थोडेसे सामाजिक योगदान आणि त्याचा नंतरचा परिणाम या गोष्टींचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो, हे अधोरेखित करण्यासाठी ‘द लिटिल थिंग्ज वी डू हे संशोधन करण्यात आले,” असे तान्या यांनी यावेळी स्पष्ट केले.
या संशोधनातून ज्या इतर गोष्टींवर प्रकाश पडला, त्या पुढीलप्रमाणे :
· 55 टक्के प्रतिसादकर्त्यांनी गरजू लोकांना छोट्या-छोट्या वस्तू दान केल्या, उदा. सॅनिटायझर्स, अन्नाची पाकिटे, जुने कपडे, ब्लँकेट्स, वैद्यकीय उपकरणे इत्यादी.
· 40 टक्के जणांनी वंचितांसाठी आर्थिक दान दिले.
· छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळी पुरुष आणि स्त्रियांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात :
o 31.74 टक्के पुरुषांनी आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालविण्यास प्राधान्य दिले व टाळेबंदीच्या काळात स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला; याच्या तुलनेत हा प्रयत्न 18.90 टक्के महिलांनी केला.
o 32.84 टक्के महिलांनी स्वयंपाक करणे या क्रियेकडे आरामदायीपणा व आनंद यांचा स्रोत म्हणून पाहिले; हा आकडा पुरुषांच्या बाबतील 11.97 टक्के इतकाच होता.
o 29.23 टक्के पुरुषांनी आराम मिळविण्यासाठी टीव्ही पाहणे पसंत केले; हीच क्रिया स्त्रियांमध्ये 21.54 टक्के जणींनी केली.
· टाळेबंदीच्या काळात ‘सोशल मीडिया’नेही स्वत:ला आनंदाचा स्रोत म्हणून प्रकट केले:
o 46.42 टक्के जण सोशल मीडियाद्वारे मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहिले.
o 23.27 टक्के लोकांनी मजेदार मीम्स व व्हिडिओ पाहिले आणि इन्स्टाग्रामवर लाइव्ह मैफिलींमध्ये हजेरी लावली.
o 19.08 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सोशल मीडियासाठी कार्यक्रम बनवून आपल्यातील सर्जनशीलतेचा शोध लावला.
o 11.24 टक्के जणांनी ‘डू-इट-यूवरसेल्फ’ व्हिडिओंच्या माध्यमातून स्वयंपाक, चित्रकला इत्यादी नवीन कौशल्ये शिकून घेतली.