पुणे – शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. रान गवा आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला . वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला.
बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. गवा चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशनानंतर रानगव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याचे वृत्त सोशल मीडियात झळकताच, सोशल मीडियातून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली.
मनुष्यवस्तीत आल्यानंतर गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत होते. रानगवा बिथरल्याने प्रथम त्याला शांत करण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. तो बहूदा डूक्कर खिंडीतून रात्री आला असावा, मात्र नागरिकांनी म्हैस असावी या शक्यतेने दुर्लक्ष केले असावे, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी माध्यमांना दिली होती. दरम्यान, बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य काही काळ रेंगाळले होते.
एका झाडाखाली शांत उभा असलेला गवा तेथून बाहेर पडून नागरी वस्तीकडे पळाला. महात्मा सोसायटीच्या गेटवरून नागरी वस्तीकडे पळण्यात यशस्वी झालेला रानगवा भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट, भारतीनगरमार्गे मुख्य पौडरसत्यावर आला आणि तेथून जूना कचराडेपोजवळील जंगलाकडे पळाला. त्याच्यामागे रेस्क्यू टीमबरोबरच अतिउत्साही नागरिक आरडा ओरड करीत पळत असल्याने गवा आणखीनच बिथरला होता. नागरिकांच्या प्रचंड गोंधळातच वन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीनवेळा भूलदेण्यासाठी फेकून मारायचे इंजेक्शन (डार्ट )मारले. त्यापैकी एक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर गव्याला जाळी टाकून पकडण्यातही आले. दरम्यान, सुदैवाने ६-७ किलोमीटर पळूनही गव्याने कोणालाही जखमी केलेले नाही. मात्र, स्वत:चा जीव गमावला.
तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात जाळ्यात अडकला वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाच्या चार तास शर्थीच्या प्रयत्नातून रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून ताब्यात घेत असताना रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोथरुडच्या इंदिरा नगर परिसरात रानगवा बेशुद्ध पडल्यानंतर त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेत असताना गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.