रोज होणारी सकाळ ही प्रत्येकासाठी खुप महत्त्वाची, आशादायी आणि प्रसन्न असावी लागते. रोज सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे, म्हणजे दोन्ही हात जोडून त्यांना विनम्र अभिवादन करावे. हे आपल्या आजी- आजोबांनी लहाणपणी शिकवलेले संस्कार. त्यावेळी त्याचे महत्त्व तितकेसे कळत नव्हते पण आज मोठं झाल्यावर मात्र त्याची जाणीव होते आहे. आज आपण जे काही आहोत ते या संस्कार आणि दत्तगुरुंच्या कृपेमुळेचं.
रोज सकाळची सुरवात होते ती दोन्ही हातांचे दर्शन घेत आणि त्याचवेळी …
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥ … हा श्लोक म्हणतच.
या श्लोकाचा अर्थही खूप परिपूर्ण आहे. आपल्या बोटांच्या अग्रामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणजेच त्या बोटांचा उपयोग करुन आपण आपली रोजची कामे करतो, याच बोटांमधल्या ताकदीने आपण लेखणी हातात धरतो आणि बोटे एकमेकांना जुळवून आपण अन्नाचा घास घेतो. खरंच आपल्या ह्या हातांना खूप महत्त्व आहे आणि त्यांना वंदन हे रोज करायला हवे.
देवाजवळ मग प्रार्थना केली जाते हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर असणार आहे. मी योजलेली कामे आज पूर्ण होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी लागणारे बळ, शक्ती आणि चांगले विचार करण्याची बुद्धी मला दे. गुरुमाऊली तू सदा माझ्या पाठीशी रहा, मग मला कशाचीही भीती वाटणार नाही, अशी प्रार्थना मी देवाजवळ करते आणि माझा दिवस सुरु होतो.
माझ्या कम्प्युटर टेबल वर तीन फोटो आहेत – 1. ज्ञानेश्वर महाराज, 2. सिद्धीविनायक, 3. सूर्याची प्रतिमा
मी माझ्या मनाने या तिघांची सांगड घातली आहे, हे माझे विचार आहेत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सरस्वती देवीचे उपासक. मनोभावे त्यांनी सरस्वती देवीची उपासना केली त्यातील एक कणभर तरी मला समजू दे. गणपती म्हणजे विद्येचे आराध्य दैवत. मला जे समजले आहे ते माझ्या कृतीतून आणि विचारातून लोकांपर्यंत पोहचू दे आणि सूर्याची किरणे ज्या प्रमाणे सगळीकडे पसरतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे चांगल्या विचारांच्या लहरी सगळीकडे पसरु दे आणि आजूबाजूचे वातावरण मंगलमय होऊ दे.
आजच्या सारखं माझ्या लहाणपणी कॉम्प्युटर, टीव्ही किंवा फेसबुक नव्हतं. शाळेतून आल्यावर थोडावेळ खेळून झालं की दिवेलागणीला हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना आणि परवचा म्हणण्याचा नित्यनेम होता. त्यात शुभं करोती बरोबर रामरक्षाही म्हटली जाई. त्यानंतर पाढे. दर गुरुवारी एकमुखी दत्ताच्या तसबिरीला हार व नैवेद्य. दत्तगुरुंच्या आराधनेचे संस्कार लहानपणापासूनच मनावर झालेत. पण खरच या सर्व नित्यनेमाचा म्हणा किंवा नकळत झालेल्या संस्काराचे महत्त्व आणि त्यामागील शक्ती अद्भूत आहे याचा आता वेळोवेळी प्रत्यय येत आहे.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडावेळ तरी मनापासून देवाची आराधना करावी. चांगलं काम करण्याचीभावना मनात ठेवावी. शेवटी आपण जे काही काम मनात स्वार्थी भाव न ठेवता करतो त्याचे आपल्याला कधी तरी चांगले फळ मिळतेच आणि आपल्याला मिळालेले आशीर्वाद, शुभेच्छा हे आपल्यासाठी कवचकुंडल्याचे काम करतात. या विश्वात ज्या चांगल्या लहरी संचारत असतात तशा वाईट लहरीपण संचारत असतात त्यांच्यापासून ही कवच कुंडले आपले रक्षण करतात. म्हणून नेहमी जेवढं होईल तेवढं चांगल घडेल ही भावना ठेवावी.
शेवटी संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच दत्तगुरु. आणि दत्तगुरुंच्या आराधनेमुळेच यश प्राप्त होते. हे संस्कार मला बालपणी मिळाले आणि या बालसंस्कारात प्रचंड शक्ती आहे याची प्रचिती आता मोठं झाल्यावर होते आहे. आज जे काही यश, प्रसिद्धी मिळते आहे ती दत्तगुरुंच्या आशीर्वादाने. या दत्तगुरुंच्या चरणी माझा मनोभावे साष्टांग प्रणिपात.
॥ श्री गुरु दत्त गुरु॥
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
– पुर्णिमा नार्वेकर, दहिसर