अरविंद भाई म्हणजे म्हणजे दादा दादरला आमच्या शेजारी रहायचे. आम्ही मराठी तर ते गुजराथी. त्यामुळे
संभाषण म्हणजे मिश्र भाषा. कधी मराठीतून तर कधी गुजरातीतून. असो पण काही असले तरी त्या
संभाषणातून व्यक्त होणारे भाव महत्वाचे होते.
गॅलरीत शेजारी-शेजारी लागून आम्हा दोन्ही कुटुंबाचे बाकडे म्हणजेच लाकडी पेट्या होत्या. सकाळ झाली की
दादाही पेपर वाचायला त्या बाकड्यावर येऊन बसायचे. आमच्या घरातील कुणी बाहेर असले की विचारपूस
व्हायची आणि त्यांच्या दिनचर्येला सुरुवात व्हायची. दादांची अंगकाठी मध्यम, उंची बेताची, वर्ण गोरा.
पांढरी शुभ्र हाफ पँट आणि बनीयन व खांद्यावर छोटा टॉवेल याच त्यांच्या घरच्या पोषाखात आम्ही दादांना
कायम पाहिले. दादांना सुपारी खाण्याची सवय होती. त्यामुळे बाहेर बसले की त्यांच्या बरोबर ती
अॅल्युमिनीयमची सुपारीचा पेटी असायची. सुपारी, अडकित्ता आणि इतर पान बनविण्याचे सामान ही
त्याच्यात असायचे. घरात गेले की परत डबा आपल्या सोबत.
आंघोळ झाली की शर्ट पँट घालून ते खाली एक चक्कर मारायला जायचे. रेल्वेतून ते सेवानिवृत्त झाले होते.
जाण्याआधी घरच्यांना विचारायचे, हुँ नीचे जऊ छु. कई लावानू छे तो के जो ?एक चक्कर मारुन आले की
धुतलेले कपडे गॅलरीतल्या दोरीवर अगदी नेमाने झटकून वाळत टाकायचे. तोपर्यंत जेवणाची वेळ झालेली
असायची. त्यांना जेवणात रोज काही तरी गोड पदार्थ लागायचा. जेवण झाले की थोडा वेळ विश्रांती घ्यायचे.
मग दुपारनंतर वाळलेले कपडे काढणे, त्यांच्या अगदी नीट घडया घालणे या मोठ्ठा कार्यक्रम असायचा त्यांचा.
दादांच्या या दिनचर्येत कधी बदल झाल्याचे माझ्यातरी आठवणीत नाही. बाहेर बाकडयावर बसून रात्रीच्या
गप्पा ह्या आमच्या दोन कुटुंबात ठरलेल्या असायच्या.
दादांना क्रीकेटचे खूपच वेड. क्रीकेट असली की मग काय दादा काही दिवसभर त्या टि. व्ही. समोरून हटायचे
नाहीत. त्यांच्या या क्रीकेटच्या वेडापायी माझा भाऊ निलेश तर त्यांना गमतीने कॅप्टन म्हणूनच हाक
मारायचा.
दादांचे अंकलेश्वरला गावी एक घर होते. त्यामुळे अधून-मधून ते आणि त्यांची पत्नी जसुबेन म्हणजेच बा सोबत
तिकडे जायचे. दादांचे कुटुंब तसे चौकोनी. दोन मुले, मन्ना आम्ही तिला मन्ना फोई म्हणत असू आणि मुलगा
हेमंत आम्ही त्यांना हेमंत मामा म्हणतो. मन्ना फोईच्या मिस्टरांना बाबा काका तर हेमंत मामाच्या बायकोला
रेखा मामी. मन्ना फोईला एकच मुलगी तिचे नाव टिना. आता ती कॅनडाला स्थायिक झाली. तर हेमंत मामाला
दोन मुले एक पिंकी म्हणजेच मेघा आता ही अमेरिकेत असते आणि मुलगा धवल, तो इकडेच असतो. तर असे हे
दादांचे कुटुंब होते.
दादांचे काही वर्षापूर्वी पायाचे फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर मग थोडी धावपळ कमी झाली आणि
वयोमानाप्रमाणे हातात काठीपण आली. तसेच त्यांच्या मनावर कौटुंबिक आघात ही खूप झाले. आणि त्यांची
मुलगी मन्ना फोईचे आजारपणामुळे निधन झाले. आपल्या मुलीचे असं आकस्मिक जाणे हे कुठल्याही बापाला
पचवणं जडच जातं. पण त्यातूनही दादा सावरले. आणि थोड्याच कालावधीत त्यांची आयुष्याची जोडीदार
म्हणजे बा पण सोडून गेली आणि सर्वात मोठा मनावर आघात झाला तो त्यांची सून रेखा वयाच्या अवघ्या 43-
44 व्या वर्षी अचानक गेली. दादांचे आणि सुनेचे नाते एका वडील आणि मुलीसारखे होते. ते रेखा मामीशी
नेहमी आपुलकीने बोलायचे. तरीही दादांनी हे तीनही आघात मोठ्या हिंमतीने पचविले आणि आपल्या
कुटुंबाला सावरले. पण अलीकडे त्यांचे दादरच्या घरी मन रमत नव्हते. तसे आमचे कुटुंबही आता दहिसरच्या
नवीन घरी अधून-मधून रहायला यायचे. त्यामुळे बोलायला कोणी नाही. मग अलीकडे दादा जास्त करुन
अंकलेश्वरला आपल्या जुन्या घरी त्यांच्या जुन्या आठवणी काढत रहाणं जास्त पसंद करत होते. दोन तीन
महिन्यांनी यायचे काही दिवस दादरला, तेव्हा त्यांची भेट व्हायची. गेल्या दोन-तीन वर्षात दादांचे काही येणे
झाले नाही. त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती… पण त्या आधीच ते गेले… ही रुखरुख मनाला कायम लागून
राहिल.
अंकलेश्वरला हेमंत मामाला भेटायला आम्ही जाऊन आलो. घरचे सगळेच भेटले. त्यांच्या नाती टिना आणि
मेघा पण आल्या होत्या…
आज खूप दिवसांनी दादरला आले आणि बाहेरच्या बाकड्यावर बसले. .. खूप वेळ बसून होते .. माहित होते की
आता शेजारच्या खोलीतून दादा बाहेर येणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे विचारणारही नाहीत की, काय ताई
काय कुठे जाते काय?… खरचं आज हे बाकडे पण सुने झालेत.. आता दादाही नाहीत आणि त्या
बाकड्यांवरच्या सुख -दुःखाच्या गप्पा ही कधीच रंगणार नाहीत… डोळ्यातल्या अश्रूंना तसेच मी ओघळू दिले
आणि निघाले.. तर बोलण्याचा आवाज आला… मागे वळून पाहिले .. तर कोणीच नव्हते .. मग हे दोन रिकामे
बाकडेच एकमेकांशी संवाद साधत होते की काय … ?
- पुर्णिमा नार्वेकर, दहिसर