‘खूप खूप थँक्स! सांगते मी निकिताला. अगं हो गं, ती बहुतेक ऑनलाईन ऍडमिशनचा फॉर्म भरत असेल, म्हणून तुझा फोन घेतला नाही. मीही आता रजा घेणारच आहे गं ऍडमिशनसाठी. नंतर मग येऊच की पेढे द्यायला.’ – ट्रेनमध्ये बाजूला बसलेली महिला फोनवर कुणाशी तरी बोलत होती.
फोन ठेवताच शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीनेही प्रश्नांची सरबत्ती चालू केलीच. ‘अगं, कधीपासून रजेवर आहेस? ऍडमिशन म्हणजे एक मिशनच आहे. मनासारखे कॉलेज मिळायला हवे ना…’ १० वीचे रिझल्ट लागले की या अशा प्रकारचे संवाद घरीदारी कुठे ना कुठे तरी कानावर पडतातच; आणि ज्यांच्या कुणाच्या घरी रिझल्ट लागलेला आहे तिकडे तर युद्धावर निघाल्यासारखी जय्यत तयारी सुरू असते ऍडमिशनची.
“आम्ही नाही का कॉलेजात गेलो. आमच्या वेळी नव्हते हे असले काही. ऍडमिशन होत होत्या ना, फॉर्म भरला की झालं. हे काय नवीनच सगळं काही. किती त्या कॉलेजेसची नावं टाकायची.” …अशाच एका पालकाची प्रतिक्रिया. ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रियाच तशी थोडीफार किचकट, पटकन न कळणारी. दहावीची परीक्षा संपली की ऑनलाईन ऍडमिशनची पुस्तिका (जी शाळेतून दिली जाते) उघडली जाते. घरातले सर्व सदस्य मिळूनच ऍडमिशनच्या अभ्यासाला लागतात. (सीरिअल बघताना जसे सर्व एकत्र बसून एन्जॉय करतात तसाच काहीसा हा सीन असतो.) एखाद्या रिकाम्या वहीची भराभरा पाने काढली जातात, जिचा जास्त काही उपयोग झालेला नसतो. आपल्याच विभागातील कॉलेजेसची नावं बघून तर आश्चर्यच वाटते…अरे ही एवढी कॉलेजेस आहेत, कधी न ऐकलेली वा बघितलेली! कॉलेजेसची ही भरमसाठ नावं असतात. मग अरे त्या हिला किंवा ह्याला विचार…गेल्याच वर्षी तो दहावी झाला ना, त्याला माहीत असतीलच की…उगाच नको आपल्याला पायपीट करायला, असं घरातील वरिष्ठ सांगतात. कुठल्या कॉलेजला प्राधान्य द्यायचे त्याप्रमाणे लिस्ट काढायला घरात गोलमेज परिषद भरते. त्यात स्पर्धाही असते. अमुकअमुकला हे चांगलं कॉलेज मिळालं म्हणजे आपल्या मुलाला / मुलीला ते मिळायलाच हवं. मग टक्केवारी चांगली असो वा नसो. हल्ली तर टक्केही सगळ्यांना चांगलेच मिळतात. बहुतेक ९०% च्या वरच ऐकायला येतात, एखाद कुणास ६०-७० टक्के मिळाल्याचे कानावर पडते. आता परिस्थिती उलट आहे. पूर्वी ९०% च्या वर टक्के मिळणाऱ्यांची संख्या फार कमी होती. मग असे टक्के ऐकले की डोळे विस्फारले जायचे. आता मात्र ६०-७० टक्के कुणाला मिळाले की कान टवकारले जातात, डोळे विस्फारले जातात (जमाना बदल गया हे बाबू…!).
बरं, नक्की कुठल्या स्ट्रीममध्ये ऍडमिशन ते बऱ्याच जणांना ठाऊक नसतं किंवा ठरलेलंही नसतं. मानसी, प्रथम आर्टस् घेणार आहेत मग मीही आर्टस् घेते…कारण तिकडे गणित नाही आणि सकाळ-संध्याकाळ क्लाससुद्धा नाहीत सायन्ससारखे…इति श्वेता, आईला सांगत होती. तर मयंकचं काही वेगळंच होतं…काहीही चालेल- आर्टस्, कॉमर्स, सायन्स. कॉलेजचा क्राऊड चांगला हवा आणि कॅम्पससुद्धा. क्लासरूममध्ये बसायचं आहे कुणाला? प्रायव्हेट क्लासेस लावायचे आहेत, असं बाबांना आधीच सांगून टाकलं आहे. काही जणांचा तर ‘तो जातोय म्हणून मी पण जाणार’ असं म्हणण्याकडे कल असतो. काही जणांना घराजवळच कॉलेज, नावाजलेलं कॉलेज, कॉलेजचा क्राऊड, कॉलेजचा कॅम्पस आणि टिचिंग स्टाफ…सगळं म्हणजे सगळंच हवं असतं. (जोडी जुळवताना जसं ३६ गुण संपन्न आहेत का ते बघितलं जातं, तसंच काहीसं!) लग्न ठरविताना जशी आजूबाजूला चौकशी केली जाते, तशीच कॉलेजची माहिती काढली जाते; आपल्या पाल्याला किती टक्के मिळाले आहेत, हे नंतर. त्यात गेल्या वर्षीची त्या त्या कॉलेजची ‘कट ऑफ लिस्ट’ चेक केली जाते. ‘दहावीनंतर पुढे काय?…’ यासाठी बऱ्याच संस्था किंवा क्लासेस फ्री(?) सेमिनारसुद्धा आयोजित करतात. किमान दोनचार सेमिनारना नक्कीच हजेरी लावली जाते आणि त्यानंतर घरी चर्चासत्र. एकदाचं, घरच्यांचं व ज्याला ऍडमिशन हवं आहे त्याचं संगनमत होऊन फॉर्म भरला जातो आणि ‘पहिली लिस्ट’ कधी लागतेय, याची आतुरतेने वाट बघत ‘मिशन ऍडमिशन’ सुरू होतं.
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068