अंदमान निकोबारमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन, मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस…वर्तमानपत्रातल्या या कॅप्शनची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तशी बातमी आलीही पेपरमध्ये. भूगोलात शिकलेल्या या नैऋत्य मोसमी वाऱ्यांशी हाच काय तो जिव्हाळ्याचा संबंध! ऐरवी वर्षभरात कुठले वारे कुठल्या दिशेने का वाहेनात, काही सोयरसुतक नसतं. असो…
मे महिन्यात घामाच्या धारांनी चिंब व्हायला झालं की मुंबईकरांना पावसाचे वेध लागतात. तसं म्हटलं तर पावसाचे वेध सगळ्यांनाच लागलेले असतात. कधी एकदाचा पाऊस पडतोय, असं झालेलं असतं. पाऊस पडण्याआधीच पावसाळी पिकनिकचे आणि ट्रेकिंगचे बेत आखले जातात. कुणी एक दिवसाच्या सहलीवर समाधान मानायचं ठरवतं तर काही मस्त ५-६ दिवसाची लंबी टूर प्लॅन करतात. एकंदरीत मुंबईकर पाऊस पडण्याआधीच सहलीचा बेत आखण्याच्या आनंदात भिजत असतो.
उगीच रोज आकाशाकडे नजर लावून ‘आज नक्की पाऊस पडणार, तसं आकाश ढगाळ दिसतंय’ असं आपण म्हणत असतो. बहुदा ठाणे, पुणे नाहीतर रत्नागिरीला पाऊस पडला असावा, असा वेधशाळेसारखा अंदाज मुंबईकर मनातल्या मनात बांधत असतो. पेपर आणि टीव्हीवरील रोजच्या बातम्यांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवले जाते. मान्सून केरळात दाखल, कोकण किनारपट्टीवर दाखल…म्हणजे चला आता ४-५ दिवसांत मुंबईत आगमन होणार, या विचाराने मनोमन न्हाऊन निघतो.
या पावसाच्या आगमनाच्या तयारीला लागतो. माळ्यावरच्या बांधून ठेवलेल्या छत्र्या लगोलग खाली काढल्या जातात. छत्रीची एक-एक काडी आणि छत्रीचं कापड नीट आहे का ते छत्री उघडून, गोल गोल फिरवून (छत्री रिपेरींग करणारा जसं फिरवतो तसं) तपासलं जातं. पावसाळी चप्पल किंवा बूट ची खरेदीही ठरलेली आणि त्यात दुकानदाराला खास सांगण्यात ही येते की पावसाळीच चप्पल हवी आहे पण ऑल सिझन ची असली तर बघा नंतर ही चालेल. रेनकोट पेक्षा स्टायलिश विंड चिटर घेण्याकडे जास्त कल असतो. आणि अतिमहत्त्वाचं म्हणजे जिवलग मोबाईलला प्लास्टीकचं कव्हर, यांची आवर्जून खरेदी केली जाते.
असंच एकदा त्याला भन्नाट स्वप्न पडतं. पाऊस कोकण किनारपट्टीवरून हळहळू मुंबईला सरकतोय आणि तो आल्याची बातमी त्याला एक केरळी माणूस फोन वरून देतोय. मुंबईकरही तितक्याच मिश्किलीने त्याला उत्तर देतोय-
काय म्हणता राव
आमच्याकडे आला,
तुमच्याकडे मुक्काम
खूप दिवस की हो झाला…
आमचाही पाहुणचार
घेऊ द्या की त्याला,
त्याच्या वाटेकडे डोळे लावून
हा मुंबईकर आहे बसला…
खरंच की हो आला
आला रे आला…
पाऊस आला…
झोपेतून उठून बघतो तर खरंच थेंबाथेंबाने पाऊस आला होता. स्वप्न एवढ्या लवकर खरं होऊ शकतं, याचं त्याला अप्रूप वाटून हसायला येतं. मस्त चहाचा घोट घेत घेत खिडकीत बसून पाऊस बघू लागला….
झोंबणारा गारवा
पाऊस सरींचा शिडकावा
मातीचा गंध नवा
गुंजतो मनी मारवा
बेधुंद क्षण हा वाटे हवा…
पहिल्या पावसाच्या सरीने बेधुंद झाल्या मुंबईकराचं आस्ते कदम प्लॅनिंग सुरूही झालं…आता दांडी कधी मारायची आणि मस्त वन-डे पिकनिक कधी करायची…??
-पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068