‘वहिनी जूनपासून शॉप सुरू होणार ना’ – सोनलचा मेसेज.
‘हो गं. आठवणीने डबा घेऊन ये. बाहेर काहीही मिळणार नाही खायला’…इति मी.
‘हो वहिनी, डबा आणणारच आहे मी.’
सोनल आणि माझ्यामधील हा मेसेज संवाद. हळूहळू लॉकडाऊन उठणार आहे. दुकानं चालू होणार तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही काही टक्के वाढ होणार. ऑफिसमधील कँटीन, बाहेरील वडापाव किंवा सँडविचची गाडी, रेस्टॉरंट यापैकी काहीही चालू होणार नसल्यानं कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला घरून डबा घेऊन जाणं मस्टच आहे.
मुंबईत करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली तसे लगोलग बऱ्याच प्रायव्हेट सेक्टरमधील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम चालू केले. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो या विचाराने डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबा सर्व्हिस बंद केली; एक कारण अजून की मुंबईची रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रेल्वेवरच तर डबेवाल्यांची मोठी भिस्त. त्यांच्यासाठी रेल्वेत खास डबाही राखीव! बऱ्याचशा कंपन्या आणि रेल्वे बंद झाल्यावर डबेवालेही डबे सर्व्हिस बंद करून गावी निघून गेले. घाटकोपरला राहणारे डबेवाले उर्जित आवरी यांनी सांगितले, “आम्ही तरी काय करणार…रेल्वेच बंद झाली. करोनाचे रुग्ण वाढायला लागले…त्यामुळे आता हातात कामही नाही, म्हणून 80 टक्के डबेवाले गावी निघून गेले आहेत. काही जण होते मुंबईत पण मे मध्ये सगळेच बहुदा गावी गेले. मी पण माझ्या गावी राजगुरूनगरला आलो. मधेच सगळं बंद झालं त्यामुळे मार्च महिन्याचेही पैसे आम्हाला मिळाले नाहीत. कसा काय मुंबईत निभाव लागणार? त्यापेक्षा गावी गेलेलं बरं म्हणून कुटुंबासोबत गावी आलो. आता परत कधी सगळं चालू होतंय याकडे आम्ही डोळे लावून बसलोय…”
प्रभादेवीला राहणारे आणि त्याच परिसरात घरगुती डबा सर्व्हिस पुरवणारे श्री. फाळके म्हणाले की लॉकडाऊनमुळे ऑफिसचे डबे सध्या बंद आहेत पण नेहमी घरी डबा मागवणारेही खूप लोक आहेत. ते सध्या घरी येऊन डबा घेऊन जातात म्हणून आम्ही डबा बंद नाही केलाय. असाच अनुभव दहिसरमधील ‘सुस्वाद’च्या निमकर यांचा आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांचीही डबा सर्व्हिस बंद झाली होती. पण 7- 8 दिवसांनी नेहमीच्या ग्राहकांचे फोन यायला लागले. मग त्यांनी पुन्हा डबा सर्व्हिस चालू केली. मिरारोड ते कांदिवलीपर्यंत सध्या फक्त सकाळचा डबा ते घरपोच देत आहेत. याआधी सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचा डबा ते देत होते; पण आता शक्य नसल्याने फक्त एक वेळचाच देत आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही असेच काहीसे अनुभव आलेत. बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्टात काम करणाऱ्या एका मैत्रीणीने सांगितले की हल्ली रोज अगदी आठवणीने डबाच काय पण सुका खाऊही न्यावा लागतो आहे. लॉकडाऊन लागल्यावर कँटीन बंद झाले कारण बरेचसे आपापल्या गावी निघून गेले. कँटीनमधील 2-3 मुलं आणि बाकी स्टाफ राहिला आहे. त्यांच्यासाठी पोळी-भाजीचा डबा आम्ही कामावर येणारे कर्मचारी घेऊन येतो. आणि एक वेळ स्वतः ते डाळ-भात करून खातात. बाहेर काहीही मिळत नाही म्हणून आमच्या साहेबांनी त्या मुलांसाठी सुका खाऊही आणून दिला आहे.
विमा कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या एका मैत्रिणीने ही परिस्थिती बिकट आहे असंच सांगितलं. कँटीन पूर्णपणे बंद. काही मुलं जी घरी जाऊ शकली नाहीत ती, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, माळी अशी मिळून 30-40 जणं आहेत. कँटीन बंद, ज्यामुळे त्यांच्या जेवणाचे हाल. मग आम्ही त्यांना रेशन भरून दिलं. त्यामुळे निदान डाळ-भातावर तरी दिवस ढकलला जातोय. आम्ही मात्र सगळे कर्मचारी नेमाने घरून डबा घेऊन येतो. साधा चहा सुद्धा मिळत नाही हो.
घरचा डबा…सगळ्यांच्या कथेतून आणि व्यथेतून घरच्या डब्याचं महत्त्व जाणवलं. शाळेत असताना नाही का आपण खाऊचा आणि पोळी-भाजीचा डबा घेऊन जात होतो. तेव्हा त्या डब्याचं आणि त्यातील खाऊचं किती अप्रूप असायचं! फास्टफूडच्या जमान्यात डब्याचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. ‘मिळतं की बाहेर सगळं, कशाला तो डबा घेऊन फिरायचं’ ही मानसिकता वाढीस लागली होती. करोनाच्या लॉकडाऊनने पुन्हा एकदा घरच्या डब्याचं महत्त्व अधोरेखित केलं. बाहेर जाताना न्यायलाच हवा आता डबा…जेवणाचा आणि खाऊचाही!
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068