अरेच्च्या! हा मेसेज तर आत्ताच फॅमिली ग्रुपवर वाचला होता…मेसेज वाचता वाचता माझ्या लक्षात आलं. फॉर्वर्डेड मेसेज…व्हाट्सअप वर येणारे हे फॉर्वर्डेड मेसेज.
सकाळी ‘गुडमॉर्निंग’ पासून जे चालू होतात ते रात्रीच्या ‘गुडनाईट’ मेसेजपर्यंत. मैत्रीचे, चांगला सुविचार, शेरोशायरी असं बरंच काही…फॉर्वर्डेड मेसेज. सकाळी उठल्यावर हात जोडून देवाचे नाव घेण्याऐवजी आता ही अशी ‘प्रार्थना’ बरेच जण करत असतील-
कराग्रे वसते मोबाईल
कर व्हाट्सअप ओपन तू
वाचता एकेक मेसेज
कर एक फॉरवर्ड हि तू
प्रभाते करदर्शनम !
बेडमधून न उठताच आधी मोबाईल हातात घेतला जातो. डोळ्यावर थोडी झोप असतेच, अशाच अवस्थेत आधी व्हाट्सअप ओपन करून पाहिले जाते आणि मग एखादा पूर्णपणे वाचलेला किंवा न वाचलेला ‘गुडमॉर्निंग’चा मेसेज फॉरवर्ड केला जातो. मग काय दिवसभर वेगवेगळ्या फॉर्वर्डेड मेसेजचा माराच सुरू होतो. काही वेळा चांगले, माहितीपूर्ण मेसेजही असतातच की…आणि ते वाचायलासुद्धा आवडतात. कुणी तरी प्रसिद्ध व्यक्ती गेल्याची किंवा काही अघटित प्रसंगाचे फॉर्वर्डेड मेसेज ताणतणाव निर्माण करतात. क्वचितच खात्री केलेली माहिती त्वरीत फॉरवर्ड केली जाते…त्याचा परिणाम काय होईल याचा सारासार विचारच केला जात नाही. मग एखादा मेसेज येतो की ही माहिती, हा मेसेज चुकीचा आहे. त्याबद्दल नंतर दिलगिरी व्यक्त केल्याचा मेसेजही फटाफट सगळीकडे फॉरवर्ड केला जातो.
फॉरवर्डेड मेसेज…न वाचता पुढे पाठवण्याची मानसिकताच आता बऱ्याच जणांमध्ये आढळते. मागे असाच एक मैत्रीच्या नातेसंबंधावर एक फॉर्वर्डेड मेसेज आला होता. न राहून मी त्या व्यक्तीला मेसेज केला- पाठवलेला मेसेज अप्रतिम आहे, याचा मराठीत अर्थ काय ते माहीत आहे का? समोरून रिप्लाय आला – माहीत नाही, पण चांगलं वाटलं म्हणून फॉरवर्ड केला. हे असं बऱ्याचदा सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल. काहीही माहिती न करून घेता, न वाचता आला मेसेज की लगेच पाठवा पुढे. त्यातही ‘स्पर्धा’ असतेच की. उदाहरणच द्यायचे झाले तर दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे मेसेज अगदी आठ-पंधरा दिवस आधीच येऊ लागलेत – ते असे की तुम्हाला शुभेच्छा देणारा / देणारी मी पहिलाच किंवा पहिलीच व्यक्ती. बरे असे मेसेज ४-५ ग्रुप वर तरी आणि १०-१२ जणांनी तरी पाठवलेला असतोच. मग यातील पहिला / पहिली फॉर्वर्डेड शुभेच्छा देणारी व्यक्ती तरी कोण? हे ओळखायचं तरी कसं? असे मेसेज वाचले की काय म्हणायचं? ते सुजाण वाचकांना समजलंच असेल.
मोबाईलच्या मेसेजमुळे आता दिवसेंदिवस एकमेकांमधील संवादच कमी होत चालला आहे. पूर्वी काही नाही तरी वाढदिवसाच्या आणि सणावाराच्या शुभेच्छांचे फोन यायचे, पण आता ते सुद्धा येत नाहीत. फॅमिलीचा किंवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असेल तर एकाने शुभेच्छा दिलेला मेसेजच, फॉरवर्डेडच्या रूपात आणखी १० जणांकडून येतो….गम्मतच आहे खरी! एकमेकांमधला थेट होणार संवादच कमी झाला असेल तर ‘बोलायचे काय’ हा प्रश्न आजच्या पिढीसमोर आहे. एखाद्या लग्नातही आताच्या जनरेशनची मुले-मुली एकत्र आली की हाय – हॅलो आणि ४-५ वाक्यं झाली की काय बोलायचं…मग सगळ्यांचा हातातील मोबाईलशी चाळा सुरू होतो! एकमेकांच्या बाजूला बसून सुद्धा बोलण्यापेक्षा आलेले मेसेज एकमेकांना फॉरवर्ड करण्यात धन्यता मानणारी आणि त्यातच आनंद शोधणारी ही आताची पिढी. (अर्थात काही अपवाद आहेतही.) गूगल सर्च आणि मोबाईलमुळे सगळी माहिती घरबसल्या मिळायला लागली. हेच अगदी शिक्षणाच्या बाबतीतही. एकाने लिहिले उत्तर किंवा असाइनमेंट मग भराभर एकाकडून दुसरीकडे फॉरवर्ड केले जाऊ लागले आणि दुसऱ्या दिवशी ‘मी सगळंच वेळेत पूर्ण केलं’ या अविर्भावाने सबमिशनही. (आमची पिढी त्या बाबतीत नशीबवान…उत्तरे आम्ही आमची पुस्तकातून शोधून स्वतःच्या भाषेत लिहीत असू, कारण त्या वेळी गूगल नव्हते आणि गाईडही सगळ्यांकडे नसायचे.) फॉर्वर्डेड असाइनमेंटने आपल्या बुद्धीचा कस लागत नाही हे या मुलांच्या लक्षातच येत नाही. खऱ्या आयुष्यात एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना मग मात्र तारांबळ उडते. कारण इकडे काही ‘इमोशनल कोशंट’ फॉरवर्ड करता येण्यासारखं नसतं …संपदाशी गप्पा मारता मारता आजच्या पिढीची कथा आणि व्यथा समजली. त्या व्यथेमधलाच एक भाग फॉरवर्ड केला.
- पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068