सकाळी सकाळी रजनीचा फोन आला. ‘बाप्पा काय हो फक्त मुलाचाच असतो का हो. मुलीचा काहीच हक्क नाही का?’ मला नीट कळले नाही म्हणून परत विचारले तिला. मला म्हणाली– ‘एखाद्या कुटुंबात गणपती असेल तर वडील गेल्यावर गणपती आणायची प्रथा ही मुलानेच चालू ठेवायची का? मुलगा नसेल आणि मुलगी असेल तर तिला हक्क नाही का? बाप्पा जसा मुलाचा आहे तसा माझाही आहे ना…’ तिचे बोलणे ऐकून मी दिग्मूढ झाले. काय बोलावे हे मलाही क्षणभर सुचलेच नाही. रजनीने फोन ठेवला पण माझ्या डोक्यातून हा प्रश्न जातच नव्हता.
खरंच एकुलती एक मुलगी असेल तर तिला वंशपरंपरांगत असलेली प्रथा पुढे चालू ठेवण्यास हक्क नाही ???? सगळीकडेच तर समानता आहे, मुलामुलींमध्ये भेदभाव नको यावर सगळीकडेच बोललं जातं. पेपरमध्ये सुद्धा मथळेच्या मथळे छापून येतात. पण प्रत्यक्ष कृतीत आणणारे मात्र थोडकेच.
आमच्याच एका ओळखीत आई गेल्यावर मुलीनेच सगळे विधी पार पाडलेत. खांदाही दिला. तिला भाऊ नाही मग तिनेच हे सगळे सोपस्कार पार पाडलेत. काही कुटुंबात तर भाऊ असून सुद्धा आईवडिलांची जबाबदारी मुलीवर येऊन पडते. त्या सांभाळ करतात. समानता सर्व क्षेत्रांत आहे की. जग कुठे चाललं आहे. चांद्रयान २ च्या मोहिमेचं नेतृत्व देखील दोन महिलांनी केलं आहे. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. तरीही काही ठिकाणी मात्र ‘मुलगाच हवा’ असा आग्रह असतो. तीन मुली झाल्या तरी अजून मुलासाठी एक चान्स घे गं… घराण्याला वारस हवा ना, असा सल्ला एक स्त्रीच एका स्त्रीला देते. अशा घटना ऐकल्या की हसावं का रडावं तेच कळत नाही.
रजनी, आईवडिलांची एकुलती एक मुलगी. खरं तर वडील गेल्यावर एखाद्या गणपती मंडळाला मूर्तीचे पैसे द्यावे असं तीचं मत होतं. पण कुटुंबातील काही जणांचे मत असं पडलं की वंशपरंपरेने चालू असलेला गणेश उत्सव बंद करू नये. मग तिनेच ठरवलं, मी आहे की त्यांचा वंश! मग मी करणार सगळं. आईचा सांभाळ आणि माहेरचे रीतीरिवाज आपला संसार सांभाळून सगळं परंपरेने चालू ठेवणारी ही गौराई. पण स्त्री म्हणून तिने ही जबाबदारी स्वीकारली म्हणून कुटुंबातील काही लोकांनी तिच्याकडे पाठ फिरवरली. वंश हा फक्त मुलांनीच चालवायचा असतो. फक्त बाकी जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत तरी चालतील असे हे आपल्या सोयीनुसार केलेले नियम. विचारांच्या गर्तेत गढून गेले होते तेवढ्यात परत रजनीचा फोन वाजला…
‘शेजारीच मामींकडे गौराईच्या दर्शनाला जाऊन आले मी आणि गौराईला सांगूनच आले कोणी काहीही म्हणू दे, पण बाप्पा माझाही आहे. काही झाले तरी बाप्पा वंशपरंपरेने मीच बसवणार. त्याच निश्चयाने घरी आले. आपल्या बाप्पाला नैवद्य दाखवला. मघाशी गडबडीत तुम्हाला विचारायचं राहून गेलं…तुमच्या सासूबाई कधी येणार आहेत माझ्या बाप्पाच्या दर्शनाला !!!’
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068