वंदेमातरम् संघटनेने कोरोना काळात देशभर परिणाम होतील असे जे काम केले त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेली आहे. ‘इंडिया टुडे’ या देशातील नामांकित आणि प्रतिष्ठित नियतकालिकाच्या वतीने दरवर्षी ‘हेल्थगिरी ॲवॉर्ड’ हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशभरात ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळात भरीव काम केले अशा संस्था आणि कार्यकर्ते यांचे व्यापक सर्वेक्षण देशभरातून करण्यात आले. या सर्व्हेक्षणातून आलेल्या माहितीतून वंदेमातरम् संघटनेच्या माध्यमातून वैभव वाघ यांनी जे विधायक काम केले त्यासाठी त्यांना संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकाचे नामांकन लाभले. पुणेकरांच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या आणि देशभर पसरलेल्या या प्रचंड कामाची नोंद राष्ट्रीय स्तरावर होणे ही निश्चितच पुणेकरांसाठी समाधानाची बाब आहे.
या नामांकनासाठी कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार, अन्नवाटप, रक्तदान, रुग्णालयात केलेली मदत अशा विविध कॅटेगरी करण्यात आलेल्या होत्या.
कोरोनाच्या काळामध्ये वंदेमातरम् संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी, युवा वाद्य पथक आणि वंदेमातरम् परिवारातील संस्था यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे काम करण्यात आले. पण त्याचा लेखाजोखा अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर पुणे शहरात गरजूंना ५,००,००० हून अधिक फुड पॅकेटसचे मोफत वितरण करण्यात आले. ४०,००० पेक्षा जास्त गरजू कुटुंबांना किराणा किटसचे वाटप करण्यात आले. ५०,००० हून अधिक कुटुंबांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले. १०० हून अधिक लोकांनी प्लाझ्मा दान केले. २४ तास सुरु असलेली रक्तदान हेल्पलाईन सुरु करण्यात आली. पुणे शहरात लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या बाहेरच्या राज्यांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली. जेष्ठ नागरिकांसाठी २४ तास कार्यरत हेल्पलाईन होती. ५०हजार हून अधिक मास्क वाटप करण्यात आले. कोरोना कालावधीत प्राण गमावलेल्या हुतात्मा कोरोना योध्यांच्या कुटुंबियांसोबत कृतज्ञता दिपावली करण्यात आली आणि त्यांना वेळोवेळी लागेल ते सहकार्य देण्यात आले. लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या युवक युवतींसाठी ऑनलाईन नोकरी विषयक माहिती प्रसारण आणि कंपन्यांच्या बरोबर समन्वय साधण्यात आला. बदलत्या परिस्थितीमध्ये स्वयंरोजगाराचे महत्व आणि त्यासाठी व्यवसायाचे महत्व जाणून ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण वेबिनार घेण्यात आले. कोरोनासह इतर आजाराच्या रुग्णांसाठी, गर्भवती महिलांसाठी आरोग्य हेल्पलाईन्स सुरु करण्यात आल्या. ईशान्य भारतातील राष्ट्रबांधवांसाठी विशेष सहकार्य हेल्पलाइन कार्यरत ठेवण्यात आली. कोरोना कालावधीतच कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात ज्या गावांचे नुकसान झाले त्या गावांना हजारो सौरदिव्यांचे मोफत वाटप केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्लाझ्मा दात्यांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून अभिनव “प्लाझ्मा प्रिमियर लीग” आणि “प्लाझ्मा स्ट्राईक” या उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले.
प्लाझ्मा आणि होमआयसोलेशन हेल्पलाईन २४ तास कार्यरत ठेवण्यात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या कोरोना मृतदेहांचे अंत्यविधीची जबाबदारी स्वरुपवर्धिनी या संस्थेने घेतली होती. या कामात पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांचा प्रतिनिधी म्हणून वैभव वाघ यांनी जबाबदारी स्वीकारली. याच कालावधीत चिपळूणला पूराचा तडाखा बसला त्यावेळी पुणेकरांच्या मदतीने मिशन जलदूत हाती घेतले आणि केवळ दोन दिवसात चिपळूणला ४२,००० लीटर पाणी रवाना करण्यात आले.
या सर्व सेवाकार्यात वंदेमातरम संघटना प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, ॲड. अनिश पाडेकर, ॲड. मनीष पाडेकर, महेश बाटले, आकाश गजमल, सुरज जाधव, संचित कर्वे, चिन्मय वाघ, वेदांत वाघ या सर्वांचा आणि वंदेमातरम् संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा होता.
जवळपास सर्वच आघाड्यांवर वंदेमातरम् संघटनेने काम केले आणि त्याचे परिणाम देशभर दिसले. म्हणूनच वंदेमातरम् संघटना ही केवळ पुण्याचाच नाही तर देशाचा अभिमान ठरली आहे.