सर्वांच्या आवडत्या गणरायाचे शनिवार 22 ऑगस्ट रोजी घरोघरी आगमन होईल. श्रीगणेशाची दहा दिवस प्रत्येक घरात मनोभावे पूजा केली जाते. श्रीगणेश स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथे जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे…
– श्रीगणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि बाप्पासारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम पालन करणे आवश्यकच आहे.
– घरात गणपती बसवण्यासाठी गणेश मूर्तीची खरेदी करताना एक महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गारेचे आहे, ती म्हणजे गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोवळ्याची आवश्यकता असते आणि या सोवळ्याचे पालन करणे खूपच कठीण जाते, त्यामुळे गणपतीची सोंड उजवीकडे नसावी.
– श्रीगणेशाची मूर्ती घेताना सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही.
– दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती घरी आणावा. कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत.
– गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते. मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूंवरही पडतोच. आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्द्येश असतो. – श्रीगणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी. गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशाप्रकारे स्थापना करावी.