मुंबई- राज्य सरकारकडून नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दुकानांसाठीही दिलेले नियमही शिथिल करण्यात आले आहेत. यापुढे दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. तसेच, ग्रंथालये सुरू करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. परंतू, शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबई मेट्रोला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. 1 ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले, याच पार्श्वभूमीवर मेट्रोसह अनलॉकच्या आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहे.