देशातल्या 8 राज्यांमधील 14 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे मी स्वागत करतो आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, आसामी, पंजाबी आणि ओडिया या 11 प्रादेशिक भाषांमध्ये बी. टेक अभ्यासक्रमांना परवानगी दिली, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. योग्य दिशेने उचललेले हे पाऊल असल्याचा विश्वास मला वाटतो.अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी, विशेषत: तंत्रविषयक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. असे प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतील.भाषा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे आपण सर्वच जाणतो. आपली मातृभाषा किंवा आपली मूळ भाषा आपल्यासाठी खूप खास असते, कारण आपली नाळ तिच्याशी जोडलेली असते. आपल्या बालपणापासून आपण तिच्याशी परिचित असतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत आपले दृढ भावनिक बंध असतात. भारत आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो आणि शेकडो भाषा आणि हजारो बोलींचे माहेर भारत आहे. आपली भाषिक विविधता ही आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आधारशिला आहे.अलीकडील भाषागणनेनुसार आपल्याकडे 19,500 भाषा किंवा बोली आहेत. वस्तुतः, आपल्या देशात 10,000 किंवा त्याहून अधिक लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्या 121 भाषा आहेत. आपल्याला लाभलेल्या या वारशात आपल्या समृद्ध आणि गौरवशाली भूतकाळाचा ठसा अद्यापही आहे, यात शंकाच नाही. महात्मा गांधी म्हणाले होते, “इंग्रजी शिकलेल्या आंग्लळलेल्या लोकांनी, जसे त्यांनी केले आहे आणि आताही काही जण करत आहेत, त्याप्रमाणे मातृभाषेची उपेक्षा केली तर भाषिक उपासमार कायम राहील’’.संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, दर दोन आठवड्यांनी एक भाषा लोप पावते आणि तिच्यासोबत एक संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा अस्तंगत होतो. तसेच, जगात बोलल्या जाणार्या अंदाजे 6,000 भाषांपैकी कमीतकमी 43% भाषा धोक्यात आहेत. भाषिक विविधतेसाठी ओळखल्या जाणार्या आपल्या देशात 196 भाषा धोक्यात आल्या आहेत. ही संख्या धोक्याची घंटा आहे. म्हणूनच, आपण आपल्या भाषांच्या संरक्षणासाठी पावले उचलणे आणि एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या देशी भाषांचे संरक्षण करण्यासाठी आणि मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. मातृभाषेच्या वापरासाठी लोकांना अधिकाधिक प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.आपल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण अनेक पावले उचलली आहेत, याचा मला आनंद आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार जिथे शक्य आहे तिथे कमीतकमी इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषा / स्थानिक भाषा / प्रादेशिक भाषा / मूळ भाषेतून शिक्षण देण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. आठवी किंवा त्यापुढेही असे करता आले तर अधिक श्रेयस्कर. सुरुवातीच्या काळात मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास मुलाचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वृद्धिंगत करत असल्याचे जगभरातील बर्याच अभ्यासात सिद्ध झाले आहे. म्हणूनच, प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देणे मुलांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरेल आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने त्यांचे मार्गक्रमण होईल.आपल्या भाषा जपण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आणखी एक प्रशंसनीय पुढाकार शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे- संकटग्रस्त भाषांचे संरक्षण व संवर्धन योजना [Scheme for Protection and Preservation of Endangered Languages (SPPEL)]. अस्तंगत होण्याचा धोका असलेल्या किंवा नजीकच्या काळात असा धोका उद्भवण्याची शक्यता असलेल्या भाषांचे दस्तऐवजीकरण आणि संग्रहण, या योजनेंतर्गत केले जाते. मात्र केवळ सरकारच्या कार्यक्रमांनी इच्छित बदल होऊ शकत नाही. आपल्या सुंदर भाषांचे संरक्षण करण्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांसाठी हा संपर्कसेतू मजबूत करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक भाषा ही मूल्ये, रूढी, परंपरा, प्रथा, कथा, आचारविचार,शिष्ठचार, म्हणी-वाक्प्रचार, नीतिसूत्रे यांचा सांस्कृतिक खजिना असल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे. लोकांना त्यांच्या मातृभाषेत संवाद साधण्यास संकोच वाटतो असे मी अनेकदा पाहिले आहे. आपण आपल्या मातृभाषेत बोलण्याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि केवळ घरीच नव्हे तर जिथे शक्य असेल तिथे मातृभाषेत संवाद साधला पाहिजे,असे माझे ठाम मत आहे. भाषा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात तेव्हाच त्या टिकतात आणि अधिक समृद्ध होत राहतात.जेव्हा मी मातृभाषा शिकण्यावर भर देतो तेव्हा याचा अर्थ इतर भाषा शिकण्याच्या मी विरोधात आहे, असा अजिबात नाही. उलट माणसाने शक्य तितक्या अधिक भाषा शिकल्या पाहिजेत, असे मला वाटते. मात्र मातृभाषेतला मजबूत पाया आवश्यक आहे.आजच्या मोठ्या प्रमाणात परस्पर जोडल्या गेलेल्या जगात, निरनिराळ्या भाषांमध्ये निपुणता व्यक्तीची वेगळी छाप उमटवू शकते. तसेच, आपण शिकत असलेली प्रत्येक भाषा आपले दुसऱ्या संस्कृतीसोबतचे बंध आणखी दृढ करते. म्हणूनच शैक्षणिक संस्था आणि पालकांनी मुलांना किमान एक राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.मातृभाषेतून शिकणे व्यक्तीची आकलनक्षमता, विश्लेषणक्षमता, समज वाढवते, हे लक्षात घेतले पाहिजे. दुसर्या भाषेतील एखादा विषय समजून घेण्यासाठी प्रथम ती भाषा शिकून त्यामध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे, ज्यासाठी खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता भासते. पण मातृभाषेतून शिकताना असे होत नाही. अभियांत्रिकी, वैद्यक आणि कायदा असे सर्व व्यावसायिक आणि तंत्रविषयक अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवले जातील, तो सुदिन पाहण्याची माझी इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने उचललेले पाऊल वाखाणण्याजोगे आहे.आपल्या उच्च शिक्षणात मातृभाषेचा वापर करणे ही आपली भाषा जपण्यासाठी व तिचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. चला एकत्र मिळून आपल्या भाषा समृद्ध करूया आणि त्यांचा विस्तार करूया. जय हिंद!