अनिश भेटला काल रात्री. सहाजिकच त्याचा पहिला प्रश्न ‘कशी झाली पुस्तक दहीहंडी?’ हा होता. काल पहिल्यांदाच असं झालं की अनिश नव्हता. कदाचित आता प्रत्येक जण आपापल्या व्यवसायांमध्ये अडकून गेल्याचं हे लक्षण असावं. त्याने एक योगायोग सांगितला कालच्या प्रमाणे २०११ साली सुध्दा ३० ऑगस्टलाच पुस्तक दहीहंडी झाली होती. आपल्या युवा वाद्य पथकाने वादन केलेली पहिली पुस्तक दहीहंडी. अनिशने हा योगायोग सांगितला आणि पुन्हा मी सुपरस्पीड ने २०१०/११ मध्ये पोहचलो.
गणराज हॉटेल मध्ये मी, मिक्क्या, सचिन, हर्षल,अनिश, चिद्या बसलो होतो. पुस्तक दहीहंड्यांची संख्या वाढवायची असेल तर आता आपलं स्वत:चे पथक हवे. केवळ आपल्या आग्रहाखातर समर्थ प्रतिष्ठान किती वेळा वादन करणार? आता आपले स्वत:चे पथक, युवा वाद्य पथक…
सांगायला आनंद होतो की पुणे शहरात अनेक ढोल ताशा पथके आहेत. ही सर्व पथके गणेशोत्सवासाठी तयार होतात पण खास करुन दहीहंडीसाठी म्हणून तयार झालेले ढोलताशा पथक म्हणजे युवा.
सन २०११. संपूर्ण देश जनलोकपाल आंदोलनामुळे ढवळून निघाला होता. आणि त्यावर्षी सप्रेम सप च्या मदतीने भ्रष्टाचार विरोधी दहीहंडी करायचे ठरले. आपले स्वत:चे पथक वादन करणार त्यामुळे वयानुसार असलेली ती एक एक्साइटमेंट होतीच. पण देशातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर परवानगीच मिळेना. विश्रामबाग पोलीस निरीक्षकांची वेळ घेण्याचा आमचा एक सहकारी प्रयत्न करत होता पण भेट मिळतच नव्हती. शेवटी आदल्या संध्याकाळी आम्ही परवानगी न घेताच दहीहंडी करण्याचा निर्णय घेतला. फ्लेक्स लावले, प्रेस इंव्हिटेशन्स पाठवली, कार्यक्रम विनापरवानगीच जाहीर करुन टाकला.
आणि कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सात साडे सात ला अनिशचा फोन वाजला. हॅलो वैभव वाघ का? अनिश म्हणाला, वैभवचा मित्र बोलतोय अनिश.. पलीकडून आवाज आला. राठोड बोलतोय, विश्रामबाग पी.आय.
या वाक्यानंतर अनिश झोपेतून पूर्ण उठला. त्याला वाटले विनापरवानगी कार्यक्रमामुळे काहीतरी उद्योग झालेला दिसतोय. त्यानुसार स्वत:ला मेंटली प्रिपेअर करतानाच पलीकडून राठोड साहेब म्हणाले सकाळ मध्ये तुमच्या कार्यक्रमाची बातमी वाचली. चांगला कार्यक्रम आहे. मला पण काही पुस्तके दान करायला आवडतील… आणि अशा प्रकारे पुस्तके पण मिळाली आणि कायमस्वरूपी परवानगी पण. आता दरवर्षी परवानगी फक्त रिन्यु करुन घ्यावी लागते. ऐन कार्यक्रमाच्या वेळी जे महिला दहीहंडी पथक बोलावले होते त्यांनी कल्टी दिली. मग काय ढोल ताशा पथकाच्या बरोबरीने ऐनवेळी आपले स्वत:चे गोविंदा पथक पण… यामुळेच २०११ ची पुस्तक दहीहंडी कायम लक्षात राहील.
दहा वर्षे झाली या गोष्टींना. सुदैवाने तेंव्हा पासून आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी, चांगली माणसे आज देखील सोबत आहेत. infact ही संख्या वाढतच चालली आहे. या उपक्रमामुळे अनेक अनाथाश्रमांमधील, खेड्यापाड्यांमधील ग्रंथालये अधिक समृध्द झाली. आदर्श मित्र मंडळ धनकवडी आणि गडचिरोली पोलीस ह्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये गावोगावी ग्रंथालये उभी करण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाला पुस्तक दहीहंडीमुळे अजून वेग मिळू शकला.
सर्वसामान्य पुणेकर नागरिक,पोलीस, अनेक कलाकार, प्रसिद्धी माध्यमांमधील आमचे सर्व मित्र मैत्रिणी असे अनेक घटक या उपक्रमात आपलं मानून सहभागी झाले. या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.
आज वंदेमातरम् संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीने जेजुरी येथे पुस्तक दहीहंडीचे आयोजन केले होते. या निमित्ताने जहिर मुलाणी सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याची पुणे जिल्ह्याच्या सामाजिक क्षितीजावर एंट्री झाली आहे. आज तिथे मोठ्या संख्येने जमलेले आणि पुस्तकांवर अक्षरशः तुटुन पडलेले बालगोपाळ पाहून खुप समाधान वाटत होते.
ओसंडून वाहणारा उत्साह आणि जल्लोषाचे प्रतिक असलेला पुस्तक दहीहंडीचा उत्सव गेली २ वर्षे खुप शांतपणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत होतोय पण पुढच्या वर्षी ही परिस्थिती नक्कीच नसेल अशी आशा आहे. पुढच्या वर्षी सगळी कसर भरुन काढू.
शेकडो ढोलताशांच्या निनादात होणाऱ्या पुढच्या वर्षीच्या विक्रमी पुस्तक दहीहंडीसाठी तुम्हाला आजच inadvance निमंत्रण. आणि हो, आज जेजुरी झाली आता लवकरच जर्मनी…
गोविंदा गोपाळा !
लेखक- वैभव वाघ