दही, दुध, त्यात थोडं कुंकु बुक्का, लाह्या याने भरलेल्या त्या हंडीवर जेंव्हा तो नारळ किंवा छोट्या बाळकृष्णाच्या हातातली काठी पडते आणि त्यामुळे एक वेगळाच ‘टक्क’ आवाज होऊन त्या दहीहंडीच्या खाली उभ्या असलेल्या तुमच्या अंगावर ते दही, दुध सांडते ना तो फीलच काहीतरी वेगळा असतो… मनावर साचलेली मरगळ एका क्षणात झटकून टाकून अंगात एक कमालीचे चैतन्य निर्माण करणारा अनुभव असतो हा.. त्यात जर हे घडताना गोविंदा गोपाळाच्या घोषणा आणि ढोलताशांचा जोरदार गजर चालू असेल तर अक्षरशः भान हरपून टाकणारा अनुभव असतो हा. आणि सुदैवाने पुस्तक दहीहंडीच्या रुपाने मला हा अनुभव दरवर्षी घेता येतो. हे मंतरलेले क्षण मला दरवर्षी जगायला मिळतात…
आज दरवर्षी प्रमाणे पुस्तक दहीहंडी झाली. कोरोना मुळे गेली दोन वर्षे पुस्तक दहीहंडी मातोश्री वृध्दाश्रमात अत्यंत कमी उपस्थितांमध्ये साजरी केली जातीए. आज सकाळी मातोश्री मध्ये जाताजाता स.प महाविद्यालयाच्या कोपऱ्यावरील चहावाल्यांच्या इथे चहा घ्यायला थांबलो. पूर्वी तिथे आमचा बेडेकरांच्या चहाचा कट्टा होता. समोर तो एसपीज बिर्याणीचा बोळ दिसला आणि डायरेक्ट पंधरा सोळा वर्षे मागे फेकलो गेलो. डोळ्यासमोर आपल्या पहिल्या पुस्तक दहीहंडीच्या वेळेची चालू असलेली धावपळ दिसायला लागली. सगळचं नवीन त्यामुळे धावपळ जास्ती. पण पहिल्याच वर्षी स्पिकरच्या भिंतींना प्रतिउत्तर म्हणून साधारण हजार दीड हजार पुस्तकांची भिंत उभी करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. मन अजून मागे गेले… आणि अनिश च्या नारायण पेठेतल्या घराच्या पार्किंगमध्ये गप्पा मारणारे मी, अनिश, हर्षल, मिक्क्या दिसलो. तिथे गप्पा मारताना मी कायम सांगायचो आपल्या घराच्या इथे अकरा मारुती चौक मंडळाने जो पुस्तक दहीहंडीचा कार्यक्रम चालू केला आहे ना तो आपण एसपी मध्ये चालू करुयात. अनिशचे तर एसपी त ॲडमिशन घ्यायचे वन ऑफ द मोटीव्हेशन हे पुस्तक दहीहंडीच होते. आणि फायनली आम्ही एस पीज बिर्याणीच्या बोळात पुस्तक दहीहंडी उभी केलीच. तेंव्हाच ठरवले होते की अकरा मारुती चौक मंडळाने सुरु केलेला हा उपक्रम आपण अजून मोठ्या स्तरावर नेऊयात. स्पिकरच्या भिंतींना प्रतिउत्तर देणारी पुस्तकांची भिंत ही एक चळवळ बनवूयात… दोन वर्ष एसपीज बिर्याणीच्या लेन मध्ये पुस्तक दहीहंडी गाजल्या नंतर पुस्तक दहीहंडीला द ग्रेट एस पी कॉलेज मध्ये राजाश्रय मिळाला आणि एस पी च्या मुलामुलींच्या मनात घर… एस पी चे कित्येक माजी विद्यार्थी “पुस्तक दहीहंडीच्या वेळी आम्ही ढोल ताशाच्या ठेक्यावर देह भान हरपून थिरकायचो” ही आठवण आज पण कुठे भेटल्यावर सांगतात. पहिल्या दोन वर्षानंतर वंदेमातरम् संघटना पुस्तक दहीहंडीची आयोजक झाली. केलेल्या विनंतीला मान देत समर्थ प्रतिष्ठान वाजत गाजत सहभागी झाले. समर्थ प्रतिष्ठान आणि आपले घर या दोन संस्थांशी पुस्तक दहीहंडीमुळे एक नातेच तयार झाले. मग पुढे माझे सहकारी सचिन जामगे यांनी युवा फिनिक्स सोसायटीची स्थापना केल्यावर युवा फिनिक्स सोसायटी आयोजकच्या भुमिकेत आली. जशी पुस्तक दहीहंडी समर्थने मनापासून वाजवली त्याच पध्दतीने टीम आंग्रेवाडाने पुस्तक दहीहंडी मनापासून सजवली. टीम आंग्रेवाडा ने सजवलेली पुस्तक दहीहंडी आणि पुस्तकांची भिंत पाहण्यासाठी एसपी मध्ये बाहेरच्या कॉलेजेस मधून पण मुलंमुली यायला लागली. हळूहळू या उपक्रमाची प्रेरणा घेत शहरात, राज्यात अनेक ठिकाणी अशा पुस्तकांच्या भिंती उभ्या राहू लागल्या.
अनेक पुणेकरांना तर ‘पुस्तक दहीहंडी आली की काही पुस्तके दान करायची’ ही सवयच होऊन गेली. भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, कॉमनमॅनचे जनक आर के लक्ष्मण, जयंत नारळीकर, विजय भटकर, रघुनाथ माशेलकर, अच्युत गोडबोले, डॉ.अमोल कोल्हे, स्वप्निल जोशी अशा अनेक मान्यवरांनी पुस्तक दहीहंडीला पुस्तकरुपी आशीर्वाद दिले. या पुस्तकांमधून सुरुवातीच्या काळात अनेक अनाथाश्रमांमध्ये ग्रंथालये तयार झाली.
खुप मोठा प्रवास आहे या पुस्तक दहीहंडीचा… एखादे छोटेसे पुस्तक नक्की तयार होऊ शकेल फक्त पुस्तक दहीहंडीच्या किस्स्यांवर… इथे ज्ञानदानाची भावना आहे, दात्यांची दानशूरता आहे, कोरोना असो किंवा स्वाईन फ्लु असो तरी चळवळ चालूच ठेवण्याचा किडा आहे, अनेकदा पैशांच्या जमावाजमवी साठी केलेले जुगाड आहेत, स्पिकरच्या भिंतीचा फ्लेक्स ३० फुटांचा असतो तर त्या शेजारी पुस्तकांच्या भिंतींचा ६० फुटांचा फ्लेक्स उभा करण्याचा मॅडनेस आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसा दहीहंडीचा खालचा थर सगळ्यात भक्कम असतो तसा भक्कम झालेला जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचा भक्कम पाया आहे…
हा सगळा विचार करता करता आवर्जून एस पी च्या गेटवर गाडी थांबवली आत जाऊन जिथे ही चळवळ बहरली त्या एस पी कॉलेज च्या जमिनीला हात लाऊन नमस्कार केला आणि या वर्षीच्या पुस्तक दहीहंडीला निघालो… पुस्तक दहीहंडीचा पुढचा प्रवास उद्या सांगतो कारण उद्याची जेजुरी येथे होणारी पुस्तक दहीहंडी पण स्पेशल आले आणि आता ही पुस्तक दहीहंडीच्या चळवळीची पताका पुढच्या पिढीच्या नव्या दमाच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर सुपूर्द करण्याची वेळ आता आली आहे…
लेखक- वैभव वाघ