शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. शरीराच्या द्रवपदार्थांचे नियंत्रित करते आणि इलेक्ट्रोलाइटचे संतुलन नियंत्रित करण्यासाठी रक्त शुद्धीकरण करण्याचे काम किडनी करते. मात्र डायबेटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे किडनी वर परिणाम होऊ शकतो. जेव्हा एखाद्या रुग्णाने त्याच्या किंवा तिच्या मूत्रपिंडाच्या ८५ ते ९० टक्के भाग गमावला असतो, तेव्हा त्यांना एंड स्टेज रेनल डिसीज (ईएसआरडी) असे म्हटले जाते.
रक्त शुद्धीकरण प्रक्रियेचा वापर करून किडनीच्या कार्यांचे अंशतः अनुकरण करणे शक्य आहे, याला डायलिसिस म्हणजे जाते. मात्र हे रुग्णासाठी असुविधाजनक व वेळ घेणारे असते. यासाठी जेव्हाही शक्य असेल तेव्हा किडनी प्रत्यारोपण हा एक उत्तम उपाय आहे.
किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णाच्या कुटुंबाला दोन गोष्टींना सामोरे जावे लागते. एक म्हणजे शवदायी दाता शोधणे व दुसरे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च. या दोन गोष्टी शक्य न झाल्यामुळे रुग्णाला डायलिसिस करणे भाग पडते. यासाठी ज्युपिटर फौंडेशन ने पुढाकार घेऊन किडनी प्रत्यारोपणाचा खर्च सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल इतका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ठक्कर म्हणाले की “ज्युपिटर फौंडेशने किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. संपूर्ण किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी रुग्णालयाला केवळ २.७५ लाख रुपये इतका खर्च येईल. सर्जरी पासून ते डीसचार्ज पर्यंत हा खर्च असेल. आमची अशी आशा आहे की, ही सुविधा किडनीच्या रोगात शेवटच्या स्टेजला असणाऱ्या प्रत्येक रुग्णापर्यंत पोहचावी व तो प्रत्यारोपणानंतर निरोगी आयुष्य जगावा”
या वेळी प्रसिद्ध अवयव प्रत्यारोपण सर्जन डॉ. गौरव चौबळ म्हणाले की “आम्ही अनेक यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले आहेत. शस्त्रक्रियेच्या दरम्यान किंवा नंतर दात्याला किंवा रुग्णाला कोणतीही मोठी समस्या येणार नाही हे सुनिश्चित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. थेट-संबंधित प्रत्यारोपणाच्या दात्यासाठी लेप्रोस्कोपिक नेफरेक्टॉमी ही प्रत्यारोपण प्रक्रिया वापरतो. याचे अनेक फायदे दात्याला आहेत यामध्ये कमी वेदना व प्रकृती लवकर बरी होणे.”
या वेळी बोलताना नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शैलेश काकडे म्हणाले कि “जेव्हा रूग्णाची किडनी कायमस्वरूपी निकामी होते व किडनीचे काम ८५ टक्के ते ९० टक्के पेक्षा कमी होते. तेव्हा अशा रूग्णांना कायम स्वरूपी डायलिसीस अथवा किडनी प्रत्यारोपण अशा उपचारांची गरज असते. रूग्णांना प्रत्यारोपणानंतर डायलिसीसपासून मुक्तता मिळते, पथ्य बऱ्याच प्रमाणात कमी होतात, शारीरिक व मानसिक स्वास्थ सुधारतं, उपचारांवरचा खर्च डायलिसीसच्या तुलनेत कमी होतो.” तसेच ते म्हणाले की “डायलिसीसची गरज भासण्यापूर्वीच केलेले किडनी प्रत्यारोपण यामध्ये रूग्णाच्या हेपिटायटीस बी वा सी यांपासून बचाव होतो. तसंच रूग्णाचं आरोग्य व नवीन बसवलेल्या किडनीची कार्यक्षमता चांगली राहते.” या क्षेत्रातील सर्वात मोठ्या किडनी प्रत्यारोपण कार्यक्रमा चालवणारे ज्युपिटर हे महत्वाचे हॉस्पिटल आहे. येथे आता पर्यंत ३३० किडनी प्रत्यारोपण शत्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. हॉस्पिटल मध्ये उच्च श्रेणीचे ऑपरेशन थिएटर, ट्रान्सप्लंट इंटेन्सिव्ह केअर युनिट, डायलिसिसची सुविधायुक्त बेड इ. सोई उपलब्ध आहेत. तसेच सर्व प्रकारचे प्रत्यारोपण शत्रक्रिया करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम येथे उपलब्ध आहे.
या व्यतरिक्त ज्युपिटर फौंडेशन ‘हृदयस्पर्शच्या’ माध्यमातून आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या कुटुंबातील बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात येते. आता पर्यंत ६५ बाल हृदय शस्त्रक्रिया ‘हृदयस्पर्श’ च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील ज्यूपिटर चॅरिटेबल इन्स्टिट्यूट चालविते. ही ५१ बेडची सुविधा आहे जेथे रुग्णांना सब्सिडीच्या खर्चात वैद्यकीय सुविधा मिळते. आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सुनिश्चित करण्यासाठी हॉस्पिटल असे अनेक पुढाकार घेते.