‘हिकमत’ ही सुवर्णा पवार (खंडागळे) लिखीत कादंबरी वाचली. लेखिकेनं सांगितल्यानुसार ‘हिकमत’ या हिंदी शब्दाचा अर्थ ‘शहाणे’ असा होतो. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं ‘शहाणपण’ नसेल तर त्या व्यक्तीच्या वाट्याला अनेक कठीण प्रसंग येतात. जीवन जगण्याला ती व्यक्ती एक प्रकारे अपयशी ठरते. या कादंबरीतील काळ साधारण 1925 ते 1970 पर्यंतचा जाणवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या दगडू आणि धोंडा (सरस्वती उर्फ सरु) या दाम्पत्याची ही कहाणी आहे. बहिष्कृत समाजातील असूनही शिक्षणाचं महत्त्व जाणून गावातील शाळेसाठी तसंच बारवाचा गाळ काढण्यासाठी दान देणारं हे जोडपं. गावकी-भावकीमुळं निर्माण झालेला गुंता, परिस्थितीमुळं जीवनात निर्माण झालेले भोवरे, त्यातून मार्ग काढण्यासाठी चाललेली धडपड, जाती-धर्मातील बदलता कल्लोळ, नीती-अनितीचा संघर्ष हे सारं ‘हिकमत’ कादंबरीत लेखिकेनं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं मांडलं आहे.
लेखिका- सुवर्णा पवार(खंडागळे),मुखपृष्ठ – दत्ता माघाडे,प्रकाशक –यशोदीप पब्लिकेशन्स,पुणे ,पृष्ठं- 192,किंमत-200 रुपये,(लेखिका मो. – 7977571848)
दगडू आणि धोंडा या मुख्य पात्रांभोवती गुंफलेली ही कादंबरी धक्कादायक, उत्कंठावर्धक, अनपेक्षित प्रसंगांनी भरलेली आहे. वयस्कर दगडूशी सरुचा (धोंडा हे विवाहानंतरचं नाव) मनाविरुद्ध होणारा बालवयातील विवाह, धोंडाची बापाशी होणारी अनपेक्षित भेट, गर्भवती धोंडाला माहेरी जातांना होणारा अपघात, अपघाताचा निरोप घेवून जाणाऱ्यापारध्यांवर चोर समजून होणारा हल्ला, पांडुरंगाचा जन्म, धोंडा दुसऱ्यांदा गर्भवती, आवडाचा जन्म, धोंडाचा बाप (कोंडाचा नवरा) घरी परतणे, पांडुरंगाचं शाळेत न जाणं नंतर रात्रशाळेत शिकणं, दगडूला जीवघेणा अपघात होवून जायबंदी होणं, धोंडूच्या कानात गोम जावून बहिरेपण येणं, नणंद गजराला लकवा येणं, लेक आवडाचं हरवणं, कोंगाडी (केरळ) राज्यात जाणं, तिथून पुण्याच्या महिलाश्रमात जाणं, गांजा विकणाऱ्या हवई मावशीकडं पांडुरंग मदत मागायला जाणं, नंदू वाण्याची शेती करणं असे असंख्य प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणं एकामागून एक येतात आणि वाचकाचं चित्त खिळवून ठेवतात.
धोंडाचा नवरा दगडू हा झाड, पाला, मुळ्यांचा गुणधर्म जाणणारा असतो. धोंडाही त्यांच्याकडून ही कला शिकून घेते, ती घरकाम, शेतीकाम, गुरं-ढोरं, औषधपाणी, बाळंतपण अशा साऱ्या आघाड्यांवर हुशार असते. अत्यंत लाघवी बोलणं, तत्पर सेवा आणि प्रसन्न हास्य असणाऱ्या धोंडाची पुढं-पुढं परिस्थिती बदलत जावून तिची एकप्रकारे परीक्षाच सुरु होते. तिची मुलगी आवडा हिला पोलीस व्हायचं असतं, पण दुर्दैवानं तिचं स्वप्नं अपूर्ण राहतं. तिच्याच वयाच्या रतन, साखर नोकरीला लागतात. स्वप्न पूर्ण न झाल्यामुळं आवडा गावी परत येते. गावातील पाटलांचा जग्या (जगन्नाथ) आणि यमिनी यांचं प्रेम जुळतं. यमिनी अशिक्षीत असते, तिच्या चिठ्ठया आवडा लिहून देत असते. जग्या प्रेमाला नकार देतो, यमिनी आत्महत्या करते. पाटलाला आणि जग्याला अटक होते. गावात सामाजिक कलह निर्माण होतो.. एकूणच कादंबरीतील शेवट उत्सुकता वाढवणारा आहे.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा महाराज यांनी दिलेल्या समतेच्या संदेशाचाही अंतर्भाव कादंबरीत पहावयास मिळतो. तत्कालिन समाजावर या महान व्यक्तींच्या संस्काराचा असलेला प्रभाव जाणवतो. कुणाचाच बाट पाळायचा नाही, समदी एकाच देवाची लेकरं, पोरांना शाळा शिकवा ही शिकवणूकही सहजतेनं कादंबरीत येते. याशिवाय मरगा, साखर, माणिक या पात्रांच्या नावनिर्मिती मागची कहाणीही रंजक आहे. लेखिका सुवर्णा पवार या महिला व बालविकास विभागात अधिकारी म्हणून सेवारत असल्यानं या कादंबरीत शाळेत मुलं यावी म्हणून त्यांना गूळ-शेंगदाणे देणं (माध्यान्ह भोजन आहार), कमवा व शिका संकल्पना, रात्रीची शाळा, छात्रावास, निराधार महिलांसाठी असणारा महिलाश्रम या योजनांचा संदर्भ आढळून येतो.
साहित्यिकदृष्ट्या या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषा. लेखिकेनं त्या काळाचं भान राखून बोलीभाषेचा वापर केला आहे. लेखिकेचं बालपण बार्शी परगण्यातच गेलेलं असल्यामुळं येथील जीवनपद्धतीचा, रिती-रीवाजांचा, स्वभावविशेषांचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. कादंबरीतील पात्र तपशीलवार, सहानुभूतीनं रेखाटतांना लेखिकेला त्याचा फायदा झाला. वाचकांनाही या अनुभवाचा आविष्कार प्रत्ययास येतो. कादंबरीतील परिसर याच भागातील, त्यामुळं त्या भागातील म्हणी, वाक्प्रचार यांचा सहजतेनं वापर झालेला दिसतो. पात्रातील अनुभवांचं शब्दरुप घेणारी ही संपदा अनेकांना नवीन वाटू शकते. ‘गव्हू तवा पोळ्या’, ‘चलतीकडं भलती’, ‘शेळीनं हुटाचा मुका घेणं’, ‘खात्या ताटात मुतणं, ‘चुलीचं लाकूड चुलीतच गॉड दिसतंय, त्यानं इसीवर (वेशीवर) झेंडा लावला तर बरं दिसणार नाही’, ‘दुकणं (दुखणं) काय घर बांधून राहातंय व्हय?’, ‘जगण्याचा बी अर्थ कळला अन् मरणाचं बी मोल कळलं’, ‘म्हशीची शिंग म्हशीला जड हायेत व्हय?’, ‘माणूस कर्मानंच मोठा असायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही’, ‘दोन प्रकारची माणसं असत्यात, एक प्रकार सत्यानं वागणारी अन् दुसरी सत्य कळूनबी असत्याची कास धरणारी’, ‘बारा चौकशा’, ‘बारा कामं, ‘बारा भानगडी’, ‘सात भार’ ही वाक्यसंपदा या कादंबरीचा महत्त्वाचा घटक आहे. निबारथड, नखाएवढ्या लेकराला, नवानवाळा, अगर, बैलगाड्याच्या चंगळ्याचा आवाज, बदामी, मेढका, घंगाळ, वसरी, ढेर, उलीसा, इराकत, कडूस, केळी, खोंगाभर, विव्हल, कैचान, टेपूर, खडूळीन, शिकुरी, गुरमाळत, दुकनकरणी, आभाळातलं तिकुटणं, कोटा, गुंडा, दोरकांड, मावाची बहिण, परवरी, कनाळी, दुनी, तिनी, खुलवर, अटकळी, ढाळज, ओश्याट, आधन, पालव्या, गळवट, आस्तुरी, सराजम, माश्याच्या चिंगळ्या, गारी, डागडुग, कलागत, छकाटी, निरशा दूध, खैयदान कुकड्या, मानमरिदा, घुमाट, उभकडी, पूस, हिवाळवास, शेजंची बायको, टणक नवरी, आग लावल्यावाणी देखणी, हडदुंबा, हिलगडी, सौन्या, च्या दारी, मुरमुस्या, बरसान, तडुप, शिसबास दोड, आंबट ओले लाकडे, इगीन, हामसाखोमसा, सादमूद, चिंदोरी, रबाडा, टरमाळी, पडतळ, डापरली यातील अनेक शब्द काळाच्या ओघात लोप पावले आहेत किंवा त्यांची जागा पर्यायी शब्दांनी घेतली आहे.
मंजुळा, भिकनराव, तायमा, सुमा, सोना म्हतारी, गुरबा पखाले, खाटीकशकूर, अनिसाबानू, महेबूब, बाबू वाणी, बावीचा धनगर, घारीपुरीचा पाटील, हौसी, तावडगावचे वामन गुरुजी, माळी गुरुजी, पांडुरंगाची बायको पद्मिनी, केरबा, सोना अशी अनेक पात्रं कादंबरीत येतात. कादंबरीच्या रुपबंधाला धक्का न लावता वाचकांना आशयात गुंतवून ठेवतात. चित्रकार दत्ता माघाडे यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ विषयाला साजेसं आहे. अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांची प्रस्तावना आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचं ब्लर्ब (पुस्तपरिचय) वाचनीय आहे.
लेखिका सुवर्णा पवार (खंडागळे) यांनी म्हटल्याप्रमाणं ‘जातीयता जीवंत ठेवून स्वार्थ साधू पहाणाऱ्या समाजविघातक कृतीला आणि जातीयतेचा बागुलबुवा निर्माण करुन सवर्णांना वेठीस धरणाऱ्या बेगडी प्रवृत्तीला ही कादंबरी सणसणीत उत्तर देते’. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी गाव-खेड्यात एकमेकांच्या अडी-अडचणींना लोकं धावून जायचे, ‘इर्जिक’ हे त्याचंच एक उदाहरण. या कादंबरीतही दगडूच्या आपत्कालिन परिस्थितीत अनेक लोकं मदतीला आलेले दिसून येतात. पूर्वीची ती परंपरा, प्रथा आता लोप पावली आहे. गावातील लोकं संकटकाळी एकमेकांच्या मदतीसाठी पुढं आले पाहिजेत. असं झालं तर नैसर्गिक संकटाला घाबरुन कोणताही शेतकरी आत्महत्येसारखा निर्णय घेणार नाही, अशी आशा लेखिका व्यक्त करतात. या कादंबरीतून आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलून आपल्या कुटुंबाला निराधार करु पाहणाऱ्या शेतकऱ्याला सकारात्मक विचार करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. ‘हिकमत’ ही कादंबरी कथात्म गद्याचं दीर्घ रुप घेवून आलेली आहे. यातील घटना, वातावरण, व्यक्ती आणि तत्कालिन जीवनाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चढ-उतारांचं स्वरुप दाखवण्यात यशस्वी झाली आहे.
राजेंद्र सरग
9423245456