जातीपातीच्या पुसण्या खाणाखुणा ‘भारतीय ‘ नावाची चळवळ अवतरली
पुणे- कोणत्याही आवश्यक त्या ठिकाणी जात धर्म : अशी विचारणा करणाऱ्या कॉलम मध्ये ‘ भारतीय ‘ अशी टिप्पणी कायदेशीर मानली जावी या अनुषंगाने पुण्यातील वैभव वाघ आणि वंदेमातरम संघटनेने सुरु केलेली चळवळ आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात “जात धर्म भारतीय” या विचाराला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून या आशयाची जनहित याचिका आज सन्मानीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे अशी माहिती वैभव वाघ यांनी येथे माय मराठी ला दिली .
कार्यकर्ता म्हणून पुण्याला परिचित असलेला वैभव म्हणाला ,’खरे तर आज खूप आनंद होत आहे की गेली काही वर्षे आपली सुरु असलेली राष्ट्रीय एकात्मतेची जात धर्म भारतीयची लढाई सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आता एका महत्वाच्या वळणावर आली आहे.
गेली अनेक वर्षे वंदेमातरम् संघटना आणि वंदेमातरम् परिवारातील सर्व संस्था “जात धर्म पंथ फक्त भारतीय” हा विचार घेऊन विविध माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारासाठी कार्यरत आहे. विविध आंदोलने, उपक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध उत्सव या माध्यमातून हे काम चालूच आहे. या कालावधीत जात धर्म भारतीय हा विचार मनापासून पटणारे आणि हा विचार कृतीतून आचरणात आणणारे अनेक राष्ट्रबांधव संपर्कात आले. विविध दौऱ्यांमधून प्रवासा दरम्यान हे पण कळले की संपूर्ण देशात जात धर्म भारतीय ही संकल्पना मानणारे राष्ट्रबांधव खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. पण जात धर्म भारतीय या संकल्पनेला शासकीय पातळीवर अधिकृत अशी कोणतीही पार्श्वभूमी किंवा कोणता कायदा, नियम नाही. त्या मुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात “जात धर्म भारतीय” या विचाराला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून या आशयाची जनहित याचिका आज सन्मानीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
वंदेमातरम् संघटना, राष्ट्रप्रथम एकात्मता परिषद आणि आय फॉर इंडिया ट्रस्टच्या वतीने वैभव वाघ यांनी ही याचिका दाखल केली. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात जात धर्म भारतीय या विचाराच्या बाजूने कायदेतज्ञ ॲड. अरविंद आव्हाड अभ्यासूपणे बाजू मांडणार आहेत. या कायदेशीर प्रक्रियेसाठी ॲड. शिवम पोतदार, ॲड.अनिश पाडेकर यांनी विशेष मेहनत घेतली असून जेष्ठ कायदेतज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड सर , डॉ. असित अरगडे , पूजा देसाई, ॲड.अजय वाघ, ॲड. मनिष पाडेकर , ॲड.तेजस दंडगव्हाळ, ॲड. विशाल सुतार, ॲड. किर्ती शिंदे यांनी विशेष सहकार्य केले आहे. वंदेमातरम् संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, पुणे शहरातील सामाजिक क्षेत्रातील आमचे सर्व गुरुबंधू आणि सर्व समविचारी मित्र मैत्रीणींची साथ तर आहेच.
राष्ट्रपुरुष आमच्या हक्काचे नाही कोणत्या जातीचे ही घोषणा देत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये चेहरेपट्टीच्या कागदावर जात धर्म म्हणून “भारतीय” असे नमूद केल्यापासून सुरु झालेली ही लोकचळवळ आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.
ज्या देशात छत्रपती शिवरायांनी जाती पातीच्या संकुचित विचारांना मूठमाती देत स्वराज्य निर्माण केले, भगतसिंगांनी कौमी एकता जिंदाबादचा नारा दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी Caste Religion only Indian चा विचार दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा अनेक राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या विविध चळवळी राबविल्या त्याच आपल्या भारतदेशाच्या सर्वोच्च न्यायालयात आता आपण “जात धर्म भारतीय” या भावनेला अधिकृत मान्यता मिळावी अशी प्रार्थना केली आहे. आता पुढील काळात निकाल लागेपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असणार आहे त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. पण खुप अभ्यासपूर्वक आणि मेहनतीने आपली बाजू सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली आहे. बघू यात आता पुढे काय होतय…