अनेक अनिवासी भारतीयांची कुटुंबे भारतात असतात – पण अन्यथा सुद्धा अनेक अनिवासी भारतीयांना आपल्या मातृभूमीबद्दल एक सखोल भावनात्मक आत्मीयता असते. भारतीय भारतात किंवा जगभरात कुठेही नोकरी किंवा उद्योगधंदा करणारे असोत, आपले स्वतःच्या मालकीचे घर असण्याची आकांक्षा हे भारतीयांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. भारतातील सण आणि उत्सवांच्या या मोसमात अनेक जण या बाजारपेठेत उडी घेण्यासाठी भारताला भेट देतात.
परंतु भारतातील सण आणि उत्सवांच्या या मोसमात अनिवासी भारतीयांचा म्हणता येईल असा कोणताही व्यवच्छेदक किंवा विशिष्ट असा कालावधी नाही.
भारतात नवरात्री पासून भारतातील सण आणि उत्सवांचा हंगाम सुरु होतो. त्यानंतर ९ दिवसांनी आपण विजयादशमी – दसरा साजरी करतो. त्यानंतर २० दिवसांनी दिवाळी येते. ज्यांना शुभ मुहूर्तावर घराची खरेदी करण्याची इच्छा असते, ते दसरा दिवाळीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करतात. दक्षिणेत ओणम हा सण घर खरेदीसाठी अतिशय शुभ असल्याचे मानण्यात येते. पण अनिवासी भारतीयांना पारंपारिक मुहूर्तापेक्षा सुटीच्या कालावधीत घरे खरेदी करणे सोयीचे वाटते.
उदाहरणार्थ नाताळ व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवडयात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड इत्यादी विविध देशांमध्ये सुटी असते. अनिवासी भारतीय काम करीत असलेल्या या देशातील बहुतांशी मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना या कालावधीत मोठ्या सुट्या देऊ करतात. त्यामुळे अनेक अनिवासी भारतीय या कालावधीत म्हणजेच डिसेंबर महिन्यात भारतात येऊन घरांची खरेदी करतात.
परंतु मध्यपूर्वेत व आखाती देशात वास्तव्यास असणारे अनिवासी भारतीय हे वर्षाच्या मध्यावर येणाऱ्या रमझानच्या महिन्याच्या सुटीत भारतात येतात. कारण त्या देशांमधील कंपन्या रमझान महिन्याच्या कालावधीत आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी सुटी देतात आणि तेथील अनिवासी भारतीय रमझानच्या महिन्यात भारतात येऊन घरे खरेदी करण्यास प्राधान्य देतात
ज्या अनिवासी भारतीयांना भारतात घरांची खरेदी करावयाची असते, ते भारतात येऊन आपले घर निवडण्याच्या अगोदर महाजालावर स्थावर मिळकतीचा भरपूर शोध व संशोधन करून आपले पर्याय अगोदरच निश्चित करतात. किंबहुना भारतात येण्यापुर्वीच ते विकासक व बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधतात व जास्तीतजास्त माहिती त्यांच्याकडून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात बोलायचे तर अनिवासी भारतीयांचा घरे खरेदी महोत्सव संपूर्ण वर्षभर सुरु असतो.
भारतात येणाऱ्या विविध अनिवासी भारतीयांच्या कालावधीत फरक असला, तरी भारतातील स्थावर मालमत्तांच्या खरेदीमध्ये अनिवासी भारतीयांचा लक्षणीय हिस्सा असतो. अनेक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या एकूण स्थावर मिळकतीपैकी ५ – ७ % मिळकती / सदनिका या अनिवासी भारतीय खरेदी करीत असतात. पण हेच प्रमाण कायम असते असेही नाही. पाश्चात्य व आखाती देशातील सण व उत्सवांच्या काळात हेच प्रमाण १० – १५ % पर्यंत सुद्धा वाढू शकते.
भारतात घरांची खरेदी करणारे अनिवासी भारतीय हे शुभ मुहूर्तापेक्षा आपल्याला परदेशातील नोकरीतून पुरेशी सुटी मिळून भारतात कधी जाता येईल यानुसार घरांची खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. वाढीव सुट्यांमध्ये ते भारतातील जास्तीतास्त स्थावर मिळकती पाहून आपल्या नोकरीच्या देशात परत जाण्यापूर्वी घरखरेदीचे व्यवहार पूर्ण करतात.
आजकाल अनेक नामवंत व्यवसायिक आपल्या संकेतस्थळावर आपल्या विविध प्रकल्पांच्या विषयी भरपूर माहिती देतात व त्यांचे विपणन विभाग सुद्धा अनिवासी भारतीयांशी सातत्याने संवाद साधत असतात. अनिवासी भारतीय हे फक्त भारतातील सण व उत्सवांच्या मोसमातच फक्त भारतात येत नाहीत तर त्यांच्या नोकरीच्या देशातील सुट्ट्याप्रमाणे सुद्धा येत असतात व त्यामुळे त्यांना अनेक प्रकारची माहिती अनेक अंगांनी लागत असते. .
बहुतांशी अनिवासी भारतीय आपल्या भारतातील कुटुंबासाठी आपल्या मूळ गावी घर खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. पण अलीकडे ज्या शहरांमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा किंवा उत्पन्न मिळेल व जिथे पारदर्शक पद्धतीने व्यवहार करता येईल अशा शहरात सुद्धा स्थावर मिळकतीत गुंतवणूक करण्यास अनिवासी भारतीय प्राधान्य देत आहेत. .
त्याचप्रमाणे अनिवासी भारतीय हे निवासी मालमत्तेतच गुंतवणूक करतील असेही नाही. व्यापारी स्वरूपाच्या स्थावर मिळकतीत गुंतवणूक हा सुद्धा एक आकर्षक पर्याय त्यांना उपलब्ध झाला आहे. पण त्यांनी कुठलाही पर्याय निवडला तरी ते कोणतीही जोखीम उचलणार नाहीत.
स्थावर मिळकत नियमन प्राधिकरण व वस्तू – सेवा कर या सुधारणांच्यामुळे आपण तत्वशून्य विकासकांकडून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणार नाही याचा अनिवासी भारतीयांना भरवसा वाटत आहे. तरीसुद्धा अनिवासी भारतीयांचे भारताच्या बाहेर वास्तव्य अस्त्ल्यामुळे ते नामवंत व आघाडीच्या विकासकांकडूनच स्थावर मिळकतीची खरेदी करतात कारण तेथील व्यवहार पारदर्शक व खात्रीशीर व कायदेशीर असण्याचा अनिवासी भारतीयांना विश्वास असतो
लेखकाविषयी
:
श्री अनिल फरांदे हे पुण्याच्या पश्चिम भागातील नगर वसाहतीच्या क्षेत्रातील अघाडीची व आयएसओ ९००१ प्रमाणित फरांदे स्पेसेस या मुख्य कंपनीच्या फरांदे प्रमोटर्स & बिल्डर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून क्रेडाई (पुणे मेट्रो) चे अध्यक्ष आहेत.