पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुढील पंधरा वर्ष काही केल्या जात नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशभरात किती प्रचार केला. तरी देखील युपीएची सत्ता येणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडत. मोदी फकीर असून राहुल फकीर नाहीत. त्यामुळे देशभरातील जनतेला राफेलवरून गाफील करू नये. हे लक्षात घेता राहुल गांधी यांनी लवकर लग्न करावं, आणि 10 /15 वर्षे संसार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, विजय काळे, चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले, रिपाइंचे शहारध्यक्ष अशोक कांबळे.मंदार जोशी आदी उपस्थित होते. त्यावेळी आठवले बोलत होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देशभरात एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात देखील महायुतीच्या प्रत्येक ठिकाणी होणार्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहे. मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजनांच्या माध्यमातुन सर्व सामन्याचे जगणे सहज केले आहे. शेवटच्या घटकाला केंद्र बिंदू ठेवून त्यांनी योजना राबविल्या आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या या कारभारामुळे पुन्हा देशात मोदी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेच्या सभांचा फायदा आघाडीला होणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगले इव्हेंट मॅनेजमेंट करणारे नेते आहेत. ते चांगले भाषण करतात. महायुतीच्या विरोधात राज्यभरात घेणार्या सभा फायदा आघाडीला होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या सभा मुळे महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. अशी भूमिका राज ठाकरे यांच्या सभा बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी
वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात तिसरी आघाडी यशस्वी होत नाही. मी सगळ्या आघाड्यांमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपसोबत यावे, त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद मिटला. पण माझा आणि प्रकाश आंबेडकरला वाद असाच आहे. ते माझा एवढा तिटकारा का करतात हे माहीत नाही, असेही आठवले म्हणाले.
कांचन कुल येणार निवडून
बारामती मतदारसंघात यावेळी परिवर्तन होणार असून, काचंन कुल निवडून येतील. गेल्यावेळी महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतले असते तर पवारांचा बुरूज ढासाळला असता. यावेळी महाराष्ट्रात महायुतीच्या 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील.
राज ठाकरेंच्या सभांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले असते. मात्र, त्यांच्या सभांचा आमच्या मतांवर होणार नाही.
चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेबांनी शिकवले
काळ्यापैशाला आळा घालण्यासाठी 10 वर्षातून एकदा चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले होते. मोदींनी बाबासाहेबांच्या मार्गावर जात नोटबंदी लागू केली. काँग्रेसने जीएसटीला पाठिंबा दिला. जीएसटीमध्ये चार-पाच वेळा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, असेही आठवले म्हणाले.