नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी अनलॉक 1.0 संदर्भात मार्गदर्शकतत्वे जारी केली. त्यावेळी देशांतर्गत रस्ते मार्गाने होणाऱ्या प्रवासासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक तसेच नागरी प्रवासावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
दोन राज्यांमध्ये तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तसेच ई-परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकार अटी घालू शकते.
“राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि परिस्थितीच्या आधारावर वाहतुकीवर काही निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना त्या संदर्भात आगाऊ माहिती जाहीर करावी लागेल तसेच सर्व प्रक्रियांचे पालन करावे लागेल” असे आदेशात म्हटले आहे.
लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन फेजमध्ये असणार आहे. प्रत्येक फेजमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.
नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यूमध्ये कपात करण्यात आली आहे. रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र, अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती.
पहिला टप्पा
– 8 जूनपासून धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहे. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.
– संपूर्ण देशात 30 जूनपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार.
दुसरा टप्पा
– शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, यांचा जुलै महिन्यात राज्य आणि केंद्राच्या परवानगीनंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियमावलीही जारी करण्यात येणार आहे. या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे.
तिसरा टप्पा
– कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो, चित्रपटगृह, स्विमींग पूल, सार्वजनिक कार्यक्रमाचे हॉल, व्यायाम शाळा, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार तसेच सार्वजनिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजनपर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.