भारतात सर्कस तुलनेने उशिरा सुरू झाली. 1880-81 च्या सुमारास चर्नी विल्सन या इंग्रज कलाकाराने ‘हर्मिस्टन सर्कस’ मुंबईतील बोरीबंदर येथे सुरू केली. ती सर्कस बघण्यास जव्हार, कुरूंदवाड?? संस्थानिक सहकुटुंब मुंबईस आले होते. त्यांच्या समवेत अश्वविद्येत पारंगत विष्णुपंत छत्रे देखील होते. सर्कशीतील चर्नी विल्सनने केलेल्या घोड्यांवरील कसरती बघून सारेच अचंबित झाले. यावेळी काहीशा अढ्यतेने चर्नी विल्सन म्हणाले की, ‘घोड्यांवरील अशा कसरती कुणाही भारती??? करता येणे शक्य नाही’ हे ऐकताच. प्रखर देशभक्त असणारे विष्णुपंत छत्रे यांच्यातील राष्ट्राभिमान जागा झाला आणि अवघ्या 6-7 महिन्यात जमवाजमव करून त्यांनी मुंबईत क्रॉस मैदान येथे तंबू उभारून आपली ‘ग्रँड इंडियन सर्कस‘ सुरू केली. या सर्कसमधील 2 सिंह, भारतमाता उभी असणारा रथ ओढत आणतात याला प्रेक्षकांचा टाळ्यांच्या कडकडाट प्रतिसाद मिळायचा. स्वतः विष्पुपंत छत्रे यांच्या घोड्यांवरील कसरती देखील दिलखेचक होत्या. हळू हळू विष्णुपंत यांची सर्कस तुफान चालू लागली आणि काही महिन्यातच बंद पडत चाललेली चर्नी विल्सनची सर्कस त्यांनी आपल्या सर्कसमध्ये सामावून घेतली. 1882 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी विष्णुपंत छत्रे यांच्या पहिल्या सर्कसचा शो म्हणजे भारतीय सर्कसचा जन्म होय.
त्यानंतर 40-50 वर्षे सर्कसची महाराष्ट्रीय परंपरा जोमाने फोफावली. यामध्ये देवल सर्कस, भीमराव पाटील सर्कस, माळी सर्कस, कार्लेकर सर्कस, वालावलकर सर्कस, शेलार सर्कस अशा अनेक सर्कशींनी मोठे नाव कमवले. यामध्येही स्वतः सर्कस मालक व त्यांचे कुटुंबीय हे सर्कसचे कलावंत म्हणून काम करीत.
पूर्वी मराठी कलावंतांचे वर्चस्व असणाऱ्या भारतीय सर्कसमध्ये आता केरळ, नेपाळ आणि पश्चिम बंगाल येथील कलावंतांचे वर्चस्व आहे. संपूर्ण जगात सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ करण्यास प्रोत्साहन मिळत असताना १५-२० वर्षांपासून सर्कसमध्ये वाघ, सिंह, अस्वल, चींपांजी, हिप्पोपोटॅमस यांचा खेळ करण्यास आपल्याकडे मात्र बंदी आहे. सर्कसचं आकर्षण त्यातून एकदम कमी झाले. वास्तविक हे फिरते प्राणी संग्रहालायचं होते पण आता आकर्षण असणारे हे प्राणी नसल्यामुळे आणि मनोरंजनासाठी सिनेमा व टीव्ही चॅनेल्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे आपल्याकडे सर्कस रोडावत गेली.
एखाद्या संगीतरजनीची तिकीटे 5 हजार रुपये असली तरी खपतात. सर्कसचे सर्वाधिक तिकीट 400 रुपये व सर्वाधिक कमी 50 रुपये असते. पगार, कलावंत व स्टाफचे नाष्टा, जेवण पाणी, औषधोपचार सारे मॅनेजमेंटला करावे लागते. विज खंडीत होऊ नये यासाठी संपूर्ण सर्कस शो जनरेटरच्या विजेवर होतो. डीझेल महागल्याने हा खर्च व ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो. पावसाळ्यात सर्कस डबघाईला आलेली असते. म्हणजे पावसाळा सोडून उर्वरीत 8 महिनेच उत्पन्न असते. शहरांमध्ये मध्यवर्ती भागात माफक दरात मैदाने मिळत नाहीत. यासार्यांतून छोट्या व मध्यम सर्कशी लयास जात राहिल्या. एका अंदाजानुसार आपल्या देशात सध्या 28 ते 30 सर्कशी आहेत. यापुढे सर्कस उद्योगाला भरभराट यावी असे वाटत असेल तर शासकीय पातळीवर सर्कशींना मदत होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये मध्यवर्ती भागात अथवा नदी पात्रे मैदानात नाममात्र भाड्याने मैदान उपलब्ध करून देणे, एसटी व रेल्वे प्रवासात सर्कस कलावंत व स्टाफला सवलत देणे, सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणे, सर्कस कलावंत व स्टाफला शासकीय पेन्शन देणे, सर्कस महोत्सव भरवणे अशा अनेक बाबी शासन करू शकते.
हे सर्व घडल्यास आपल्या देशातील सर्कसला खऱ्या अर्थाने भरभराटीचे दिवस येतील आणि सर्कसची अशी भरभराट व्हावी हे माझ्याप्रमाणे आपल्यालाही वाटत असेल अशी मी अपेक्षा करतो. भारतीय सर्कसच्या जन्म दिनानिमित्त सर्कस कलावंत , स्टाफ सर्कशीतील प्राणी आणि सर्वांचा लाडका विदुषक यांना मी शुभेच्छा देतो.
प्रवीण प्र वाळिंबे