नागपूर -तुम्ही बेईमानी करून सत्तेवर आलात असे प्रत्युत्तर आज सकाळी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.फडणवीस पुढे म्हणाले, “काल मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”.
राज्यातल्या मंत्र्यांकडे वसुलीची सॉफ्टवेअर असल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.. ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दलही त्यांनी भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, “ईडी, सीबीआय का येत आहे? ती आम्ही आणलेली नाही. ती उच्च न्यायालयाने आणली आणि याचं कारण काय आहे? तर माननीय उद्धवजी, ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात, ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल. या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे खंडणी वसुली. राज्यातल्या आयकर विभागांच्या छाप्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आयकर विभागाने जे सांगितलं ते ऐकून राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नाही पाहिजे की राज्यात अशा प्रकारची, एवढ्या मोठ्या प्रमाणात दलाली चाललेली आहे. दलाली या स्तरावर पोहोचली आहे की आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट मिळतात की कोणाकडून किती वसुली करायची आहे. हे जर चालत असेल तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ईडी, सीबीआय येणारच आहे. ज्याने काही केलंय त्यालाच यांचं भय असणार आहे”.शेतकऱ्यांना मदत करायला या सरकारजवळ पैसे नसतात. आश्वासने द्यायची आणि पाठ दाखवत केवळ कारणं सांगायची”.