मुंबई-इथे कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? असा सवाल करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्ही बॉलिवूड घेऊन जायला आलो नाही, आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत. अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली. तसेच बॉलिवूड मुंबईतच राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, “इथे कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? ही खुली स्पर्धा आहे. कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची, सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल. उत्तर प्रदेशातील नवी फिल्मसिटी त्यांचे काम करेल, असेही आदित्यनाथ म्हणाले.
शिवसेनेला काढला चिमटा
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुणीही कुणाची गुंतवणूक घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही तर भारताची अर्थव्यवस्था वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचेही लक्ष असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला.
वर्ल्डक्लास फिल्मसिटी बनवण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. जागतिक दर्जाची फिल्मसिटी तयार करण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा केली. आम्ही कुणाचे काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असेही आदित्यनाथ म्हणाले.
अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी – मंत्री रझा
उत्तर प्रदेशमधील फिल्म सिटीवरून सुरू असलेल्या राजकारणादरम्यान योगी सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत. अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांना मुंबई सोडून उत्तर प्रदेशात यायची इच्छा आहे. मात्र त्यांना अंडरवर्ल्डद्वारे धमकावले जात आहे असा आरोप मोहसीन रझा यांनी केला.