लॉकडाऊनदरम्यान घरगुती वीजेचे बिल तब्बल 40 हजार रुपये आल्याने नागपुरात लीलाधर गायधने यांनी जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाना साधला आहे.
ट्विटरवर फडणवीसांनी लिहीले की, ‘सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या शॉकमधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?’ असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, ‘कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !’, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.