निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ईव्हीएमला विरोध करण्यासाठीच आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हवी ही आमची नाही तर जनतेची भावना आहे ती आम्ही मांडतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जपान, नेदरलँड आणि अमेरिकेत या तीन देशांमध्येच Evm ची चीप तयार होते. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झाला आहे अशात आम्ही त्याच देशात आमच्या देशातल्या Evm ची चीप आणली जाते तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. ३७१ मतदारसंघांमध्ये घोळ आहे, ५४ लाख मतांचा गोंधळ आहे असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.
ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली किंवा पद्धत अंगिकारली त्या देशांनीही आता ईव्हीएमची पद्धत बाजूला ठेवली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर लोक तुम्हाला पुन्हा निवडणून देतील. तुम्हाला बॅलेट पेपरला घाबरण्याची गरज काय? असं छगन भुजबळ यांनी विचारलं आहे. लोकांची भावना लक्षात घेऊन आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. लोकांची भावना काय आहे ते लक्षात घेण्यासाठी आम्ही घराघरांमधून ईव्हीएम नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी करणारा एक फॉर्म महाराष्ट्रातल्या घरांघरांमधून भरुन घेतला जाईल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.