पुणे (मावळ), दि. ११ ऑक्टोबर – मावळ तालुक्यातील पवना जलवाहिनी बंद आंदोलनाच्या गोळीबर घटनेतील १३०० शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. लखीमपूरच्या घटनेचे केवळ राजकीय भांडवल करणा-या महाविकास आघाडी सरकारने आधी या १३०० शेतक-यांच्या प्रश्नाला तातडीने न्याय दिला तरच तुमच्या आघाडी सरकारला शेतक-यांच्या प्रति संवेदना आहेत व त्यांच्या प्रश्नी खरोखर कळवळा असल्याचे सिध्द होईल. अन्यथा महाविकास आघाडी सरकार हे शेतक-यांच्या प्रश्नावर केवळ राजकीय नौटंकीच करत असल्याचे महाराष्ट्राच्या कोटयवधी जनतेला समजेल अशी घणाघाती टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
९ ऑगस्ट २०११ रोजी पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील गोळीबारामध्ये शहिद झालेल्या शेतक-यांच्या हुतात्मा स्मारकाला विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज भेट दिली. हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या आंदोलनात शहिद झालेले स्व. कांताबाई ठाकर यांच्या येळेस येथील निवासस्थानी, स्व. मोरेश्वर साठे यांच्या शिवणे येथील निवासस्थानी व स्व. शामराव तुपे यांच्या सोमटणे येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय( बाळा) भेगडे, माजी सभापती एकनाथ टीळे,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, किसन संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार,अंकुश पडवळे,नारायण बोडके,बबनराव कानेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, मावळ येथील पोलिसांच्या गोळीबारात शहिद झालेल्या निरपराध शेतक-यांसाठी कॅबिनेटमध्ये श्रद्धांजली वाहिली गेली नाही. परंतु लखीमपूरच्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. लखीमपूरची घटनेचा आम्हीसुध्दा नक्कीच निषेध करतो. परंतु हे सरकार राजकारण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे आहेत. त्यांनी येथील १३०० शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय केले? की हे प्रेम पुतना मावशीचे आहे जे लखीमपूरच्या माध्यमातून दाखवले जात आहे, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, मावळमध्ये आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणा-या निष्पाप शेतक-यांवर ९ ऑगस्ट २०११ रोजी अमानुष गोळीबार झाला. त्यांच्या स्मृती हे सरकार विसरले. केवळ लखीमपूरच्या घटनेला जालियानवाला बाग हत्याकांडाची तुलना करणा-या शरद पवार साहेब यांना कदाचित मावळच्या अमानुष घटनेचा विसर पडला असावा. कारण या सरकारला मावळ येथील शेतकऱ्यांविषयी संवेदना नाहीत, म्हणूनच त्या स्मृती उजागर करण्यासाठी आपण या शहिद शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
आज अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. महाराष्ट्रात निसर्गवादळाचे संकट आले. तौक्ते वादळाचे संकट आले. या सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांनी ठोस मदत दिली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना २०१९ ला जो जीआर काढला, त्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतक-यांना अभूतपूर्व मदत झाली व शेतक-यांना दिलासा मिळाला होता. नुकसान झालेल्या शेतक-यांचे सरसकट पंचनामे न करता त्यावेळी सरकारकडून त्यांना मदत झाली. गुरे, जागा, घरांना सगळ्या अर्थाने मदत झाली. असे सांगताना ते म्हणाले की, आज मराठवाड्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला त्याला एक दमडीची मदत दिली नाही. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. देवेंद्रजीच्या काळात पीकविम्याचे पैसे भरले नव्हते तरीही त्या शेतक-यांना ५० टक्के विम्याचे पैसे मिळाले.
शेतकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, त्यांना बघायला सरकारकडे वेळ नाही का ?
लखीमपुर येथील घटना वाईट आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. कोणालाही पाठीशी घातलं जात नाही आहे. परंतु आपल्या राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. हे सरकारला दिसून येत नाही का ? उपमुख्यमंत्री पुण्याचे आहे, यायला जायला त्यांना मावळ येथून यावं जाव लागतं, मग आपल्या सरकारच्या कारकिर्दीत मावळ येथे झालेल्या घटनेची जबाबदारी का घेत नाही. गोळीबारात आंदोलक शेतकरी हुतात्मे झाले. कै. सौ. कांताबाई ठाकर, कै. मोरेश्वर साठे, कै. शामराव तुपे यांच्या मुला मुलींना नोकरी देण्याचं काम बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. त्यांच्यावर लादलेला दंड सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने भरला. त्या आंदोनलकर्त्या शेतक-यांच्या विरुध्दचे गुन्हे सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नाने मागे घेण्यात आले. त्यावेळेला १३०० शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न देवेंद्र फडणीवस सरकारने अंतिम टप्प्यात आणून ठेवला. पण दोन वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून अजूनही हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. लखीमपूरच्या शेतक-यांची काळजी करायला व लखीमपूरच्या घटनेचे राजकारण करायला मविआला वेळ आहे परंतु आज मावळ येथील शेतकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना बघायला वेळ नाही का ? मावळच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, आपल्या मातीतल्या शेतकऱ्याला आज त्रास होत आहे, त्याकडे सुद्धा लक्ष द्या. केवळ बाहेर घडलेल्या घटनेचे येथे सोयीचे राजकारण करायचं आणि येथील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं हे चालणार नाही असा टोलाही दरेकर यांनी यावेळी मारला.