‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ शिबिरात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे विशेष मार्गदर्शन…
शिर्डी- आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ते म्हणाले,’ राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आ शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असेही ते म्हणाले. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.