शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रनोट हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. यानंतर तिच्यावर टीकेची चांगलीच झोड उठली. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी तिला धारेवर धरले.
दरम्यान कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले – आम्ही फक्त धमकी देत नाही अॅक्शन घेतो
यावर आता संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊत म्हणाले की, “ही मुंबई 106 हुतात्म्यांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले.
“धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
- राऊत म्हणतात – मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे
दरम्यान राऊत यांनी एक ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे, असे म्हटले आहे. ”मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. promise,” अशा आशयाचे ट्विट केले आहे.