पुणे-
विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहजपणे बंडखोरी केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतो, घेतो, करीत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात यश मिळविले आहे . नेमके हे ‘राजकारण ‘ विलास लांडे यांनी का केले ? त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काय करावे लागते हे ठावूक नव्हते काय ? आणि माघारी घ्यायचाच होता तर भरला तरी कशाला होता ? या अशा प्रश्नांवर आता खल होतो आहे . पण खरे कारण हे अनिल भोसलेंना च ठावूक आहे असा दावादेखील लांडे यांच्या गोटातून केला जातो आहे .
उमेदवारी अर्जमाघारी साठी आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांनी विलास लांडे यांच्या मागे लकडा लावला होता .अजितदादांनी देखील लांडे यांना सांगितले होते . मग माशी नेमकी कुठे शिंकली ?
दरम्यान आज शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे देखील गुलदस्त्यात आहे उमेदवारी माघार घेण्याची आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. शिवसेनेचे माऊली खंडागळे, औंध येथील उद्योजक गणेश गायकवाड, काँग्रेसचे डमी उमेदवार गोपाळ तिवारी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान विलास लांडे यांनी ३ वाजण्यापूर्वी माघार घेण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवला होता. मात्र त्याच्याकडे लांडे यांच्या सहीचे अधिकार पत्र नव्हते अशी तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगून अधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर स्वतः विलास लांडे ३ वाजून १० मिनिटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आणि अर्ज माघारी घ्या अशी विनंती करू लागले. यावेळी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले हे देखील लांडे यांच्यासोबत अधिकाऱ्यांना विनंती करत होते. मात्र नियमानुसार वेळ संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी माघारी अर्ज स्वीकारला नाही.
दरम्यान मनसेचे नगरसेवक बाबु वागस्कर यांनी विवरण पत्र सादर न केल्यामुळे त्यांचा अर्ज यापूर्वीच छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेसचे संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले, भाजपचे अशोक येनपुरे, अपक्ष उमेदवार यशराज पारखी आणि उमेदवार विलास लांडे यांच्यामध्ये होणार आहे.
कधी काळी लक्ष्मण जगताप यांचे जवळचे स्नेही म्हणून ओळखले जाणारे विलास लांडे चांगले सरळमार्गी राजकारणी म्हणून देखील ओळखले जातात. गेल्या २५ वर्षापासून ते राजकारणात आहेत.महापौर आमदार अशी पदे त्यांनी भूषविली आहेत त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्यांना चांगलीच माहिती आहे. आता त्यांचा अर्ज राहून काय फरक पडणार आहे ? असाही सवाल आहेच . पण नेमके हे राजकारण कशासाठी? यावर रंगतदार चर्चा होणे हि सहाजिक आहे . महापालिकेच्या निवडणुका हि आता तोंडावर आहेत . त्यामुळे या निवडणुकीला अत्यंत महत्व प्राप्त होत आहे