पुणे-पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या मतदार संघात प्रचाराला कशासाठी ? असा प्रश्न राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी येथील जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला आहे पर्वती विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेद्वार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
येथील वाळवेकर लॉन येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी ,नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे स्वागत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.सभेसाठी नगरसेवक आणि कार्यकर्ते वाजत गाजत आणि मिरवणुकीने सभास्थानी आले. त्यामुळे वातावरण भारून गेले होते. त्यातच पावसाने हजेरी न लावल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ओसवाल,आणि आरपीआयच्या ( आठवले गट ) वतीने बाबुराव घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
पंकजा मुंडे यांनी सांगितले की , शहर आणि जिल्ह्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. त्यामुळे यशाबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही. निवडणूक म्हटली कि विविध प्रकारच्या अफवा पसरत असतात .पण त्यावर कोणताही विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे. त्यामुळे विजयश्री खेचून आणणे अवघड होणार नाही . आजची सभा हि प्रचाराची नाही तर विजयाची सभा झाली पाहिजे.
केंद्र सरकारने अनेकविध योजना आणल्या आहेत असे नमूद करून त्यांनी सांगितले कि, निवास ,स्वच्छतागृहांची सुविधा, स्वछता अभियान,अशा अनेक योजना केल्या आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाने महिलांसाठी योज़ना राबवल्या आहेत.महिला बचत गटांच्या माध्यमातून सुमारे ४४ लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आघाडीच्या वतीने कितीही चुकीचा प्रचार केला गेला तरी त्याचा उपयोग होणार नाही असे त्यांनी ठामपणाने सांगितले.
महायुतीच्या उमेदवार मिसाळ यांनी गेल्या दोन टर्म मध्ये केलेल्या विविध विकास कामाची माहिती सांगितली. याही निवडणुकीत मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले. या प्रतिसादामुळे निवडणुकीतील माझा विजय नक्की आहे असे त्यांनी सांगितले.