बार्शी-: पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,’ असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘युतीचं सरकार असताना शिवसेनेनं १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही,’ असं पवार म्हणाले.
संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शीमध्ये आयोजित सभेमध्ये शरद पवार बोलत होते . ते म्हणाले,’राज्याच्या राजकारणात बदल करण्याची गरज आहे. यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून आपल्याला सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.
मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात? देशाचे गृहमंत्री म्हणतात शरद पवार यांनी ५० वर्षात काय केलं? त्यांना एकच प्रश्न करतो की तुमच्यातील एक माय का लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल.
हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन खोटं ठरलं. इतक्यावरच थांबले नाही तर महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्ले पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता? इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे जाहीर केले मात्र तेही पूर्ण केलेलं नाही.
मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. हे म्हणजे नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना लहान पोरंटोरं समजू लागले आहेत. फक्त मोठा आकडा दाखवून शेतकरी समाजाला फसवण्याचा काम त्यांनी केलं आहे.
आम्ही सत्तेत असताना शेकडो कारखाने काढले यातून लाखो हाताला रोजगार मिळाला. आजचे सत्ताधारी असलेले कारखाने बंद करण्याच्या भूमिका घेत आहे. लाखो तरुणांनी यातून आपला रोजगार गमावला. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
आता एकायला येतंय की १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत.