पुणे- एकर आणि हेक्टर मधला फरक कळत नाही. पिक कर्ज काय ते कळत नाही ,साखरेतल काही कळत नाही. सातबारा कोरा करणार होते त्याच काय झालं, सातबारावर किती कॉलम असतात हे माहिती आहे काय ? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लागवताना गृहमंत्री पद घ्यायला घाबरत असाल तर ते खाते शिवसेनेला द्या, या शब्दात भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान केले.
क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी आज फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी ज्या भिडे वाड्यात शाळा सुरू केली त्या वाड्याचे स्मारक व्हावे यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
– पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जनतेची परवड सुरू आहे. सरकार स्थापनेपासून बेकायदा कामकाज सुरू आहे. अद्याप मंत्रिमंडळातील खाते वाटप झालेले नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. सातबारा वर किती कॉलम असतात याची माहिती तरी आहे ? दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ केले. पण सातबारावर असलेल्या अन्य बोजा चे काय ? याचा विचार न करता केवळ फसवणूक केलेली आहे, असा टोला त्यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. नुकतेच साखर सम्राटांच्या एका कार्यक्रमात साखरेचा विषय आला की जयंत पाटलांना विचारा हे मुख्यमंत्र्यांचे उत्तर मिळते या शब्दात चंद्रकांत पाटलांनी ठाकरे यांना चिमटा काढला.