तालुका स्तरावर हेलिकॉप्टर सेवा देणार ..आम्ही फक्त देना बँक . लेना बँक नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर – ज्याला सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत त्यांना आव्हान देऊ नका .. टीकेची, आरोपांची मर्यादा असते ती ओलांडू नका असा स्पष्ट इशारा नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला, एवढेच नव्हे तर इशारा हिऱ्या पोटी गारगोटी अशी उपमा देखील उद्धव ठाकरेंना दिली.
कंगना राणावतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. उद्योजकांकडे टक्केवारी मागितली, असा घणाघात शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल केलेल्या आरोपांना उदाहरणे वाचून दाखवत उत्तर दिले.
प्रबोधकारांचे वारस म्हणवणारे लिंबू- टिंबूची भाषा करतायत. मी वर्षांवर जाण्याआधी तिथे वाटीभर लिंबे सापडली, असा दावा करून त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला.
रेशीमबागेत गेलो गोविंद बागेत नाही
बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार कुणाला आहे. गोविंद बागेत जाणाऱ्यांना का असा सवाल उपस्थित करताना, बाळासाहेबांच्या विचारांमुळेच रेशीम बागेत गेलो असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. यामुळेच ‘राष्ट्रवादी’ची शिवसेना असे जयंत पाटील योग्यच बोलले असा टासेलाही त्यांनी लगावला. काँग्रेससोबत गेले तेव्हाच बाळासाहेबांच्या नाव घेण्याचा अधिकार तुम्ही गमावला असेही त्यांनी म्हटले. एक माणूस चुकेल हो, पण 50 लोक कशी चुकतील म्हणत आम्ही 50 जण सत्तेतून बाहेर पडलो असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
‘मविआ’ने पत्रकारांनाही त्रास दिला
शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. बाळासाहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा मी तुमच्या पाठिशी आहे, पण हे तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेत होते. कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले असा, आरोपही शिंदेंनी केला आहे. मविआ विरोधात बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला गेला असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
शिंदेचा ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, दिव्यागांसाठी मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. आपल्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. सरकार बदलले नसते, तर नागपुरात अधिवेशन झाले नसते, असा दावाही त्यांनी केला. शिंदे म्हणाले की, धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. अतिवृष्टीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत दिली. शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टने फिरले पाहिजे. त्यासाठी तालुकास्तरावर हेलिपॅड करू. हेलिकॉप्टरने फिरणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे टोमणे मला मारले. मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.