मुंबई- आज थोड्यावेळापूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे त्यांनी म्हटले आहे कि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे.
तत्पूर्वी आज सकाळी माध्यमांशी बोलताना मात्र राऊत आशावादी विधाने करत होते . “एकनाथ शिंदे आणि आमदारांची नाराजी हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे.” राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आमदार नाराज असल्यासंबंधी विचारल्यावर राऊत म्हणाले की, “मला याबद्दल माहिती नाही. त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत. असं कोणत्याही आमदारानं म्हटलं असेल असं मला वाटत नाही.” असं राऊत म्हणाले होते त्यानंतर दोन तासातच त्यांनी नवे ट्वीट केले आहे ज्यातून विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले आहेत.
सकाळी ते असेही म्हटले होते ,'”आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेत काम केलं आहे. त्यांच्याशिवाय आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही. एकनाथ शिंदेंसोबत सतत संपर्कात आहोत. शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत, असंही राऊतांनी सांगितलं.