मुंबई-लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराचा विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकारने आज बंद पुकारलेला आहे. या महाराष्ट्र बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत नाही.’ असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.या शिवाय पोलिसांनी या बंद ला मदत केल्याचा आरोप हि त्यांनी केला .
राज्य सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर या सरकारने आज संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे. अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लखीमपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही.आज शेतकरी हे संकटामध्ये आहे. तसेच हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, मात्र त्यांच्या सर्व घोषणा या हवेतच विरल्या आहेत. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचे सरकारच बरे होते असेही लोक म्हणत आहेत.
मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. बंद करणारी ही तीच मंडळी आहे की ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे आंदोलन करायची नैतिकता तरी आहे का? असा सवालही फडणवीसांनी केला आहे. तसेच लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार यावर कारवाई करत आहे. मात्र आजचा बंद हा तेथील घटनेविषयी संवेदना दाखवण्यासाठी नाही, तर त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचारने केलेला आहे’ असे म्हणत फडणीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.