‘नाशिक-वाघाशी कधीच मैत्री होत नसते, वाघच ठरवत असतो कुणाशी मैत्री करायची’, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदेश दिल्यावर आम्ही वाघाशी(शिवसेना) मैत्री करायला तयार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावा, ते गोड माणूस आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही राऊत यावेळी म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं मला दिसत नाही. मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असेल तर तो त्यांच्या पक्षातील मुद्दा आहे. आजही नरेंद्र मोदी हे भारतीय पक्षाचे मोठे नेते आहे. गेल्या सात वर्षात जे भाजपला यश मिळाले आहे ते नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे झाले आहे. फोटो कोणत्या नेत्याचा वापरायचा हे कार्यकर्त्यांवर ठरलेलं असतं. त्यामुळे लोकांच्या मनात एखादा नेता असेल तर ते पुसता येत नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.