मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी जीवाला धोका असल्याचे सांगत आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. यामुळे आमच्या सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या जीवालाही धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.