मुंबई-राज्यात महाविकासआघाडी सरकारचं अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यापासून भाजपाकडून सातत्याने सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले जात आहेत. त्यापाठोपाठ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारची साथ सोडून भाजपासोबत जाईल, अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. सत्तास्थापनेआधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी करून स्थापन चालवलेल्या ८० दिवसांच्या सरकारमुळे देखील या चर्चांमध्ये तेलच ओतलं गेलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं भाकित केलं आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्याी यांच्यावर टीका केली होती. याविषयी अंदली दमानिया ट्वीटमध्ये म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत”.