पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. “घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,” असं ट्विट करत कन्हैयानं पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. या संघर्षानंतर केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असून, जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना १५ जून रोजी गलवान खोऱ्यात मोठा संघर्ष उफाळून आला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. याप्रकरणावर सरकाकडून अधिकृत माहिती न आल्यानं विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चिनी सैन्यानं भारताच्या भूभागात घुसखोरी केली नव्हती, असा दावा मोदी यांनी केला होता.