भाजपसह महाविकास आघाडीला केला सवाल …?
पुणे-महाराष्ट्रात विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. मातंग समाजावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी यंदा मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी मातंग समाजातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीतर्फे गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे शहाराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, आरपीआय मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे, भाजपाचे बापूसाहेब कांबळे, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे, नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले, सर्व राजकीय पक्ष मातंग समाजाला गृहीत धरतात. आमचा समाज हा विकासापासून वंचित आहे. या समाजाला प्रतिनिधित्व देताना दुर्लक्षित करू नका. तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला संधी द्या. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. तिन्ही पक्षांच्या लोकांना भेटून आमच्या समाजाचा प्रतिनिधी 70 वर्षांत विधानपरिषदेवर गेला नाही हे सांगणार आहे.महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याकडेही याबाबत मागणी करणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात जर समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्यास समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.सुभाष जगताप म्हणाले, आमचा समाज कष्टाळू आहे. आजपर्यंत संधी न देणे हा अन्याय आहे. शिक्षणापासून वंचित असलेला हा समाज आता एकजूट व्ह्यायला सुरुवात झाली आहे.आतापर्यंत आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली नाही, मात्र महाविकास आघाडीने संधी दिली, हा संदेश जाणार आहे.हनुमंत साठे म्हणाले, मातंग समाजाला संधी देण्याची गरज आहे. शासनाने आमच्या समाजाचा विचार करावा.बाळासाहेब भांडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांना मानणारे हे सरकार आहे.मातंग समाजातील साहित्यिक, कलावंत, खेळाडू, राजकीय प्रतिनिधी कोणालाही विधान परिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी अविनाश बागवे यांनी केली आहे.