काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकती काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असे म्हटले आहे. आता यानंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न समोर आला आहे. गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष असावा आणि गांधीं कुटुंबातीलच अध्यक्ष असावा असे दोन मतप्रवाह पक्षात निर्माण झाले आहेत. तर राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केली आहे.
नुकतीच 23 काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न लवकरचात लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.
अशोक चव्हाण म्हणतात की, देश आणि कॉंग्रेसला एकत्र ठेवण्यासाठी गांधी-नेहरू घराण्याचे नेतृत्व आवश्यक आहे. ते पक्षाचे महान आश्रयदाता आहेत आणि इतिहासात हे बर्याच वेळा सिद्ध झाले आहे. ही वास्तविकता लक्षात घेऊन पक्षाने पुढील निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच सोनिया गांधींनी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा असे म्हटल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘सीडब्ल्यूसी कॉंग्रेस अध्यक्ष पदाबाबत योग्य तो निर्णय घेईल, परंतु पक्षातील लोकप्रिय आवाजानुसार राहुल गांधींनीच या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला पाहिजे.’
तसेच अशोक पुढे म्हणाले की, ‘सोनिया गांधी यांनी कठोर काळात कॉंग्रेस पक्षाची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली यूपीए सरकारने न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.’