मुंबई दि.२ मार्च* :शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व दलालांचे उच्चाटन करण्यासाठी कै.बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची घोषणा सरकारने एक वर्षापूर्वी केली होती, परंतु, ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला त्यांच्या नावाने सुरु केलेली योजनाही सरकारला राबवता आली नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी सरकारवर केली.दरेकर आज विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. त्यांनी असेही सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने माननीय राज्यपालांवर टीका करण्याचं काम केलं, राज्यपालांसारख्या सांविधानिक पदाची गरीमा घालवण्याचं काम राज्य सरकारच्या प्रमुखांनी केलं आहे. परंतु, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना आपण जनतेसाठी काय दिवे लावले, याचाही विचार सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. करोना उपाययोजनांवर बोलत असताना दरेकरांनी महाराष्ट्रात ५२,००० लोकांचा मृत्यू झाला असताना त्याबाबत चिंता करण्याऐवजी सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे, डब्ल्यूएचओने धारावीच अभिनंदन केलं, त्या डब्ल्यूएचओला आणि जगाला दिशा देण्याचं काम मोदींनी केलं. केंद्र सरकारने करोनासाठी सर्वच राज्यांना मदत केली, महाराष्ट्रालाही केली, परंतु, त्याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात केलेला नाही. राज्याच्या योजनांच्या बाबतीत बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, विकेल ते पिकेल अभियानात १३४५ मूल्य साखळी विकासाचे प्रकल्पाचे नियोजन सरकारने केले, परंतु, आजपर्यंत त्यांना स्टाफ सुध्दा दिलेला नाही, या योजनेची सरकारला ५% सुद्धा अंमलबजावणी करता आलेली नाही, अशीच अवस्था अनेक सरकारच्या निर्णयांची असून सरकारने जाहीर केलेल्या निर्णयांची, योजनांची अंमलबजावणी करण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे.