मुंबई-अर्णब गोस्वामी प्रकरणात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. फडणवीसांनी सोमवारी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्णब गोस्वामींना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अर्णब गोस्वामींकडून सातत्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहेत. अलिबागवरून तळोजा तुरुंगात नेत असताना अर्णब गोस्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.