नवी दिल्ली -पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या का वक्तव्याचा संदर्भ देत सरकारला टोला लगावला आहे. चीन आपली जमीन घेत आहे आणि पुन्हा ती ताब्यात घेण्यासाठी आपल्या सरकारकडे मात्र काहीच योजना नाहीय असा टोला राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.
“चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचं?,” असे ट्विट राहुल यांनी केलं आहे.